
सीमेवर धगधगत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सैनिकी ताकदीचा जगाला ठोस संदेश दिला आहे. या निर्णायक क्षणी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेला पाठिंबा देशवासीयांच्या मनात नवा आत्मविश्वास जागवतो आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव शिगेला पोहोचलेला असताना, ऑपरेशन सिंदूर या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची लहर उसळली आहे. पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या या अभूतपूर्व कारवाईला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) ठाम पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या कारवाईचे प्रखर समर्थन करत भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे आणि देशवासीयांमध्ये आत्मगौरवाचे स्फुल्लिंग चेतवले आहे.
भागवत यांनी आपल्या म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले आहे. पहलगाम येथे निःशस्त्र हिंदू पर्यटकांवर झालेल्या कायरतापूर्ण हल्ल्यानंतर भारताने जे कठोर पाऊल उचलले, ते योग्यच आहे. हे केवळ सूड नाही, तर देशाच्या अस्मितेचा आवाज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्र सरकारच्या नेतृत्वाचे आणि भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक करत म्हटले की, आम्ही पहलगाममधील हत्याकांडानंतर पाकिस्तानप्रायोजित दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर या निर्णायक लष्करी कारवाईचे मनःपूर्वक स्वागत करतो. ही कारवाई देशासाठी आवश्यक आणि अपरिहार्य आहे.

एकता महत्त्वाची
मोहन भागवत यांनी असेही म्हटले आहे की, देशाच्या सीमांवर धार्मिक स्थळे आणि नागरिक वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्य जे बर्बर हल्ले करत आहे. त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा अमानवी आणि निर्दयी हल्ल्यांमध्ये ज्या कुटुंबांनी आपले प्रियेजन गमावले आहेत. त्यांच्या प्रती आम्ही अत्यंत सहवेदना व्यक्त करतो. मोहन भागवत यांनी पुढे म्हटले की, ही वेळ एकसंघ राहण्याची आहे. राष्ट्रविरोधी शक्ती समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करतीलच, पण आपण सर्वांनी सावध राहून एकतेचे आणि सहभावाचे बळ वाढवायला हवे.
Kirit Somaiya : अकोला बनली फेक बांगलादेशी बर्थ सर्टिफिकेट फॅक्टरी
संघाने देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की, सरकार व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा. देशासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडा. सैनिकांना, पोलिसांना, आणि आपत्कालीन सेवांना जेथे आवश्यक असेल तेथे पूर्ण सहकार्य करा. हीच खरी देशभक्ती आहे. मोठ्या संकटाच्या वेळी देशाचे सामर्थ्य लोकांच्या एकतेतून उगम पावते, असे मोहन भागवत यांनी ठामपणे नमूद केले.
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे की भारत शांततेचा समर्थक असला तरी, आत्मसन्मानाशी तडजोड करणारा देश नाही. आता संघटित राष्ट्र म्हणून आपण केवळ लढणारच नाही, तर जिंकणारही हेच मोहन भागवत यांच्या शब्दांतून उमटलेले स्फूर्तिप्रद संदेश आहे.