
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्याच्या आणि संघावर टीक करणाऱ्यांबाबत मोठे विधान केले आहे.
भारताला स्वातंत्र्य कधी आणि कसे मिळाले यावर अनेक वेळा राजकीय वर्तुळांत चर्चा होत असते. या चर्चेच्या यादीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं नावही सामील झालं आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर त्यांनी केलेल्या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू केली आहे. नचिकेत प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या ज्येष्ठ संघ स्वयंसेवक रामचंद्र देवतारे यांच्या संघ जीवन भाग 1 व 2 या ग्रंथांचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी शिक्षक सहकारी बँक सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला नचिकेत प्रकाशनचे श्रीनिकेतन सांबरे, रामचंद्र देवतारे तसेच संघकार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांची सुरुवात 1875 स्वातंत्र्य संग्रामापासून मानली. स्वातंत्र्य कोणत्याही एका व्यक्तीमुळे मिळाले नाही, तर तो अनेक लोकांचा, अनेक प्रकारचा आणि सातत्याने चाललेला संघर्ष आहे, असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी आपले जीवन अर्पण केले. स्वातंत्र्य हे एक सामूहिक कार्य आहे, ज्यात प्रत्येकाचा वाटा आहे. कुठल्याही व्यक्तीला किंवा गटाला संपूर्ण श्रेय देणे चुकीचे आहे. कारण यात अनेकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचीच ताकद आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले.

Sanjay Gaikwad : लाडकींवर कोट्यवधी रुपये उधळण्यापेक्षा रायगड वाचवा
समज जबाबदारीची
संघाचे कामही हजारो स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळे चालते, आणि संघाची दिशा अनेक विचारांच्या मंथनातून निश्चित होते. जे काही संघ बोलतो आणि करतो, ते सर्व सामूहिक सहमतीने ठरवले जाते, असे भागवत यांनी सांगितले. अनेकदा काही लोकांच्या श्रेयात वाया गेलेल्या चांगल्या कामांबद्दल लोकांना माहिती नसते. मात्र, संघाच्या कार्याचे मोल समजणाऱ्या लोकांना त्यातून खूप काही शिकायला मिळते, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी फक्त सरकारकडून अपेक्षा ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारकडूनच सर्व अपेक्षा असू नयेत, असे ते म्हणाले. माझ्या कुटुंबापलीकडे जाऊन आपल्या शेजारातील आणि समाजातील दुर्बल घटकांचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हे फक्त सरकारचे काम नाही तर आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी आवाहन केले. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे, असे त्यांनी जोर देऊन सांगितले. संघाविषयी समाजात अनेक गैरसमज असून, काही लोक संघावर चांगले-वाईट दोन्ही प्रकारच्या टीका करतात. मात्र, संघाच्या कामकाजाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांची भूमिका बदलते आणि ते संघाकडून खूप शिकतात, अशी अनुभूती सहभागी व्यक्तींनी व्यक्त केली.