
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन महानायक असलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार, श्री गुरुजी माधव गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) इतिहासाचे त्रिवेणी संगम मानले जाणारे तीन महानायक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर (गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित ‘संघगंगा के तीन भागीरथ’ हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस येत आहे. यावेळी या नाट्यकृतीचे सादरीकरण नागपूरनंतर थेट रामटेकमध्ये होत आहे. 5 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या तोडर सभागृहात हे भव्य आयोजन होणार आहे. हे नाटक नि शुक्ल असणार आहे. आरएसएसच्या प्रत्येक स्वयंसेवकाला ही गाथा सांगण्यात येणार आहे.
भव्य सांस्कृतिक प्रयोगात संघाचे पहिल्या तीन सरसंघचालकांची जीवनगाथा रंगमंचावर जिवंत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या अंकात डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासून ते क्रांतिकारी विचारांपर्यंतचा प्रवास, ‘वंदे मातरम’ चा उद्घोष, काँग्रेस अधिवेशनातील सक्रिय सहभाग आणि पुढे स्वयंसेवक संघ स्थापनेपर्यंतची प्रेरणादायी कथा सादर केली जाईल. विशेषतः गांधीजी-हेडगेवार भेटीचे नाट्य रूपांतरण ही या भागातील जिवंत झलक ठरणार आहे.दुसऱ्या अंकात श्री गुरुजींचा जीवनप्रवास केंद्रस्थानी आहे. ‘अखंड नंदचे सात वार्ता’ या संकल्पनेतून त्यांचे विविध पैलू उलगडले जातील.

Chhagan Bhujbal : मुंडेंना मिळाली क्लीनचीट तर सोडून देणार सीट
ऐतिहासिक प्रसंगांची मांडणी
हेडगेवार यांचे अंतिम भाषण, गुरुजींचे सरसंघचालक बनणे, वल्लभभाई पटेल यांच्याशी संवाद, काश्मीरचे विलीनीकरण, संघावर बंदी आणि त्या काळातील बाळासाहेबांचा उदय अशा अनेक घटनांची प्रभावी मांडणी होणार आहे. आपत्कालीन सत्याग्रह, रामजन्मभूमी आंदोलन आणि संघाच्या कार्याचा विस्तार हा कालखंड बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वात संघाने कसा झपाट्याने पार केला, हेही या प्रयोगात प्रेक्षक अनुभवणार आहेत. संघ गंगा हे नाटक म्हणजे राष्ट्रीयत्व, तपस्या आणि संघटनात्मक नेतृत्व यांचा त्रिवेणी संगमच आहे.या नाटकाच्या पूर्वप्रसंगी नागपूरमध्ये झालेल्या प्रयोगावेळी संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भावस्पर्शी अभिप्राय दिला होता.
जोशी म्हणाले, रामायण किंवा महाभारताचे सादरीकरण सोपे असते कारण आपण राम किंवा कृष्णाला प्रत्यक्ष पाहिले नाही. पण डॉ. हेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेब यांच्यासारख्या महामानवांना आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यांच्या कार्याची गंगा अजूनही वाहते आहे. कोणीही ती थांबवू शकलेले नाही. गंगेचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले, गंगा कधीही अपवित्र होत नाही, असं नाही पण तिच्यात असलेली आत्मशुद्धीची ताकद हीच तिची खरी ओळख आहे. संघगंगा देखील अशीच आहे. अनेक आव्हानांमधून वाहत राहूनही ताजीतवानी राहते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामटेकमध्ये संघाचे विविध पदाधिकारी, स्वयंसेवक आणि विचारवंतांची मांदियाळी जमणार आहे. संघाच्या इतिहासाशी संबंधित नव्या पिढीला या नाटकाच्या माध्यमातून प्रेरणा देणे हे या आयोजनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग