
अकोला शहरात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे एक महाकाय झाड रस्त्यावर उभ्या वाहनावर कोसळले. वाहनात अडकलेल्या नागरिकांची मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली.
अकोल्यात 27 मे मंगळवारी सायंकाळी शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या जोरामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतूक ठप्प झाली, तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. अशाच वेळी शहरातल्या एका मुख्य रस्त्यावर एक महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, एका चारचाकी वाहनावर झाड कोसळल्याने वाहनात असलेले काही नागरिक अडकले. ही घटना शहरातील वर्दळीच्या भागात घडल्याने काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली. कोसळलेले झाड एवढे मोठे होते की, त्याच्या फांद्या संपूर्ण वाहनावर पसरल्या होत्या आणि बाहेरून आत काही दिसत नव्हते. दरम्यान, घटनास्थळी जवळून जात असलेल्या आमदार साजिद खान पठाण यांच्या नजरेस ही परिस्थिती पडली. त्यांनी लगेचच वाहन थांबवले आणि मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी झाडाखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आसपासच्या नागरिकांना मदतीसाठी हाक दिली. काही वेळातच काही वाहनचालक आणि स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे आले.

एकत्र मदत
पावसाच्या धारा सुरू असतानाही सर्वांनी मिळून झाडाच्या फांद्या बाजूला करत अडकलेल्यांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अडकलेले नागरिक सुटकेनंतर थोडे गोंधळलेले दिसले, मात्र त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नव्हती. शहरात अचानकपणे आलेल्या या पावसामुळे काही भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून महापालिकेच्या आपत्कालीन पथकांकडून रस्त्यांवरील अडथळे हटवण्याचे काम सुरू होते. ही संपूर्ण घटना काही नागरिकांनी मोबाईलवर चित्रित केली असून ती सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. घटनास्थळी दाखवलेल्या तत्परतेमुळे मदतकार्य लवकर पूर्ण होऊ शकले.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक भागांत अजूनही पाणी साचलेले असून वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. प्रशासनाकडून सफाई कामे आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. अशा अचानक निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी शहरात आणखी प्रभावी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या घटनेने शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनाची क्षमता आणि सज्जता पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात आणली आहे.