
खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस मागण्या मांडल्या. अपघात कमी करण्यासाठी नवीन पूल, महामार्ग रुंदीकरण आणि ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणेवर त्यांनी भर दिला. या प्रकल्पांनी वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळेल.
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. लोकसभेत दमदार पद्धतीने आपली मागणी मांडत खासदार संजय देशमुख यांनी या दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यावश्यक रस्ते आणि पूल निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याचा आग्रह धरला. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी विविध प्रकल्पांना गती देण्याची गरज केंद्र सरकारकडे स्पष्टपणे मांडली.
यवतमाळमधील संविधान चौकात सतत अपघात होत असून, या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संविधान चौकात नवीन ब्रिज उभारण्याची मागणी त्यांनी लोकसभेत मांडली. तसेच, वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करून चार लेनचा करण्याची मागणीही त्यांनी केली.

अपघातांना आळा घालणे आवश्यक
खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत ठामपणे सांगितले की, गेल्या वर्षभरात संविधान चौकात शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून चिंतामणी पेट्रोल पंप ते पांढरकवडा रस्त्यावरील स्मशानभूमीपर्यंत उड्डाणपूल उभारला पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडी नष्ट होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
चौपदरीकरण प्रकल्प गरजेचा
वाशिम शहरातून जाणाऱ्या एमएच-161 महामार्गाचे काम सध्या दोन लेनवर सुरू आहे. मात्र, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने पूर्वीच या मार्गासाठी चार लेन कॉंक्रिट रस्त्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्वरित पूर्ण होण्यासाठी आणि वाशिमच्या नागरिकांना सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीची सुविधा मिळण्यासाठी खासदार देशमुख यांनी हा मुद्दा लोकसभेत लावून धरला.
आर्थिक तरतूदीसाठी आग्रह
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. पिंपळगाव ते दारगाव या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वन विभागाच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना पंधरा किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे. खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा उचलून धरत, हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. दिग्रस ते पुसद बायपास प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण झाले असले तरी, अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने काम रखडले आहे. हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी स्पष्ट मागणी खासदार देशमुख यांनी केली.
विकासाच्या दिशेने ठाम पाऊल
खासदार संजय देशमुख यांच्या या मागण्यांमुळे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने या मागण्यांची त्वरित दखल घेतली तर या भागातील नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार वाहतूक सुविधा मिळणार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे येत्या काळात यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल, यात शंका नाही.