
काश्मीरमधील हल्ल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे व पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आक्रमक राष्ट्रवादी भूमिका घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राठोड यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता वेळ आली आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याची.
संजय राठोड म्हणाले की, शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाशी घट्ट जोडलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या भूमिकेला जो सातत्य दिला, तोच विचार आज शिंदे गटातून पुन्हा एकदा स्पष्टपणे पुढे येत आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या मातृभूमीबद्दल स्वाभिमान आणि अभिमान बाळगला पाहिजे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो.

हल्ल्याचा निषेध
काश्मीरमध्ये जे काही घडलं ते फक्त एका प्रदेशावर झालेला हल्ला नाही. तर देशाच्या अस्मितेवर झालेला घाव आहे. हा हल्ला देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनाला क्लेश पोहोचवणारा आहे. दहशतवाद्यांनी हे कृत्य करताना धर्म ओळखून हल्ला केल्याची बाब संजय राठोड यांनी ठामपणे अधोरेखित केली.
काही वर्षांपूर्वीपर्यंत काश्मीरमध्ये अस्थिरता होती. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर 370 कलम हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर व्हायला लागली. देशभरातून आणि जगभरातून पर्यटक पुन्हा काश्मीरकडे वळू लागले. परंतु, पाकिस्तानच्या कटकारस्थानामुळे पुन्हा एकदा हा शांततेचा प्रवास खंडित झालेला आहे.
Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा
आता कृतीची वेळ
संजय राठोड यांनी या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले की, केंद्र सरकारने आता पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय थांबू नये. देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या स्वाभिमानासाठी जे काही करावं लागेल, त्यासाठी शिवसेनेचा शिंदे गट पूर्णपणे केंद्र सरकारच्या पाठीशी राहील. शिवसेनेचा मूळ विचार म्हणजे राष्ट्रहित आणि हिंदुत्वाची सशक्त भूमिका. संजय राठोड यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आता तीच भूमिका शिंदे गटाकडून पुन्हा एकदा जोमाने पुढे नेली जात आहे.
दहशतवाद्यांनी जी कृत्य केली, ती केवळ निर्दोष नागरिकांवर नव्हे, तर भारताच्या सन्मानावर आघात करणारी आहेत. हे सहन करणे अशक्य आहे. संजय राठोड म्हणाले की, देशातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वास केंद्र सरकारवर आहे. आता पाकिस्तानने जी चूक केली आहे, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. केंद्र सरकारने यावेळी ठोस कारवाई करून संपूर्ण देशवासीयांचा विश्वास अधिक बळकट करावा, अशी भावना आता उभा महाराष्ट्र व्यक्त करत आहे.