महाराष्ट्र

Mahavikas Aghadi: महिला असुरक्षित, मंत्री बेशरम 

Maharashtra Budget Session : संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार आक्रमक

Author

महिला सुरक्षेचे ढोल पिटणाऱ्या महायुती सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश करत सरकारला जबर धक्का दिला आहे.

महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महायुती सरकारमधील मंत्र्यांची बेशरमी समोर येत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

महिला सुरक्षेचे वारेमाप गाजर दाखवणाऱ्या सरकारचा खरा चेहरा उघड होत आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते आणि आता मंत्री स्वतः महिलांना अश्लील फोटो पाठवतात. हे सरकार महिलांसाठी धोकादायक बनले असून, या विकृतीला खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

Maharashtra Budget Session : भ्रष्टाचार, गुंडगिरी, घोटाळ्यांचा स्फोटक पर्दाफाश

अमित शहा यांना पत्र

प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात महिलांना सुरक्षितता नाही, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत आणि आता सत्ताधारीच महिलांवर अत्याचार करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांनी हा विषय थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाका, अन्यथा राज्यभर आम्ही आंदोलन उभे करू,असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. महिला सुरक्षित नसतील, तर सरकारला गादीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

सरकार गुन्हेगारांची

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावर सरकारवर घणाघात केला आहे. सरकारचे मंत्रीच जर महिलांसोबत असे वर्तन करत असतील, तर सामान्य महिलांचे काय?असा संतप्त सवाल त्यांनी केला. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना सरकार गप्प आहे. कायदा-सुव्यवस्था कोसळली आहे. हे सरकार गुंडांना आणि गुन्हेगारांना पाठबळ देत आहे, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

पीडित महिलेचे आंदोलन 

घटनेतील पीडित महिला आता थेट आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. या विकृत मंत्र्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर मी रस्त्यावर उतरेल, असा इशारा तिने दिला आहे. यामुळे महायुती सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्यात आधीच महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना आता सत्ताधारीच असे प्रकार करत असल्याने सरकारला लाज वाटायला हवी. हे सरकार मंत्र्यांचे गुन्हे लपवण्यात व्यस्त आहे, महिलांचे संरक्षण करण्यात नव्हे, असे टीकास्त्र संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार दोघांनीही सोडले आहे.

महायुतीला जबर फटका 

विरोधक आक्रमक झाले असून, सरकारवर कारवाईचा दबाव वाढला आहे. प्रकरणावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणावर मौन बाळगणार की दोषींवर कठोर कारवाई करणार? महाराष्ट्रातील जनतेचे डोळे आता सरकारच्या पुढील पावलांवर लागले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!