
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच मुद्दा गाजत आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून नवीन वादंग पेटले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या कबरीला हटवण्याची मागणी केली आहे, तर राज्य सरकारदेखील यावर विचार करत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी या कबरीचे महत्त्व वेगळ्या दृष्टीकोनातून स्पष्ट करताना ती कायम ठेवावी, असे मत मांडले आहे. त्यांच्या मते, औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतिक आहे आणि ती इतिहासाच्या दृष्टिकोनातून कायम राहिली पाहिजे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमीच आपल्या ठळक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. औरंगजेबाचा मुद्दा उफाळला तेव्हापासूनच ते सरकारला धारेवर धरण्याचे प्रयत्न करीत आहेत. यातच त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर आणि हिंदुत्त्ववाद्यांवरही कडवट शब्दांत निशाणा साधला.

Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज
मोदींचे तैमूरप्रेम
संजय राऊत म्हणाले, ‘औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे, हे मान्य आहे. पण त्याचवेळी, देशातील अनेक मंदिरं पाडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करणाऱ्या तैमूरलंगच्या नावावर बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आपल्या मुलाचे नाव ठेवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे कौतुक करतात.
गंभीर आरोप करीत त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा सैफ अली खान आणि करिना कपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले, तेव्हा तैमुर त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांना त्याची आठवण झाली होती. त्याला पाहून त्यांनी त्याला उचलले असते, पप्पी घेतली असती. मग असे हिंदुत्त्ववादी लोक तैमूरला स्वीकारतात, पण औरंगजेबाच्या कबरीवरून आक्षेप घेतात. हा दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो.’
भाजपाचा दांभिकपणा उघड
संजय राऊत यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या स्थितीची तुलना मुघल सम्राट शाहजहांशी केली. त्यांनी सांगितले की, ‘लालकृष्ण आडवाणी हे राम मंदिर उभारणीसाठी प्रमुख व्यक्ती होते. त्यांनी संपूर्ण देशभर हिंदुत्त्वाच्या प्रचारासाठी प्रयत्न केले. मात्र, आज त्यांची अवस्था शाहजहांसारखी करून ठेवण्यात आली आहे. भाजपानेच त्यांना बाजूला केले आहे. हा भाजपाचा दांभिकपणा दाखवतो.
औरंगजेबाच्या कबरीच्या वादाने राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. एका बाजूला हिंदुत्ववादी संघटना ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही राजकीय नेते तिला मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून पाहत आहेत. त्यातच, संजय राऊत यांनी भाजपावर आणि हिंदुत्त्ववाद्यांवर जोरदार टीका करत त्यांच्या दुटप्पीपणाचा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण आता आणखी किती मोठे स्वरूप धारण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.