
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त करून आणखी खळबळजनक दावा केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे. एवढेच नव्हे, तर काँग्रेसमध्ये सामील झाल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते, असे पटोले यांनी जाहीरपणे सांगितले. या धक्कादायक वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आश्चर्य व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की, नाना पटोलेंची ऑफर ऐकून मी अवाक् झालो. यावर काय बोलावे हेच कळत नाही. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, ते मोठे नेते आहेत. राजकारणात काहीही शक्य आहे. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन समीकरणे पाहत आहोत. महायुतीतील नाराजी, अंतर्गत संघर्ष, रुसवे, फुगवे आणि आदळआपट, हे उघडपणे दिसत आहे. अशा वेळी नाना पटोलेंनी ही ऑफर जाहीर करून एकप्रकारे वादाच्या ठिणग्या पेरल्या आहेत. ही ऑफर देऊन नाना पटोले यांनी भांडे लवकर वाजवलं. त्यांना थोडा संयम ठेवायला हवा होता, असे राऊत म्हणाले.

शिंदेंवर घाणाघात
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांचा भगव्या झेंड्याशी काहीही संबंध नाही. ते आता फक्त भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांच्यासोबत अजित पवारही भाजपचा झेंडा हातात घेऊन राजकारण करत आहेत. शिवसेनेचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे आणि तो केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
राजकीय चर्चांना आणखी धार देत संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला. एकनाथ शिंदे एकेकाळी काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा, त्यांना याची माहिती आहे. दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासोबत दिल्लीत पहाटेच्या वेळी त्यांची चर्चा झाली होती. या सर्व हालचालींची माहिती सर्वाधिक मलाच आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे.
राऊतांचे आरोप
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ आणि सरकारच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत यांनी महायुती सरकारला जबरदस्त फटकारले. हे सरकार दुतोंडी आणि ढोंगी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते केवळ सत्तेच्या राजकारणात मश्गूल आहेत. बुलढाण्यातील कैलास या शेतकऱ्याने कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळवला होता, मात्र तोच शेतकरी आत्महत्या करतो. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहूनही मदत मिळाली नाही, हे दुर्दैवी आहे. ही फक्त कैलासची नव्हे, तर संपूर्ण शेतकरी वर्गाची आत्महत्या आहे. आता या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.
नाना पटोलेंच्या या ऑफरनंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे आणि अजित पवार यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.