संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या हिंदूत्वाच्या दुटप्पी राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. “हिंमत असेल तर मोहन भागवतांना प्रश्न विचारा” असे सांगत त्यांनी भाजपचे हिंदूत्व फक्त विरोधकांसाठीच असल्याचा आरोप केला.
महाकुंभ संपून महिना उलटला तरी हिंदूत्वाच्या नावावर राजकीय नाटक अजूनही सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे कुंभस्नानाला का गेले नाहीत, असा सवाल करत हिंदूत्वाचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी थेट पलटवार करत भाजप आणि शिंदे गटाच्या हिंदूत्वाच्या ढोंगी राजकारणाचा पर्दाफाश केला. “हिम्मत असेल तर मोहन भागवतांना हा प्रश्न विचारा. भाजपाचे बॉस हिंदू नाहीत का?” असा घणाघात करत राऊत यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आक्रमक वार केले.
भाजप आणि शिंदे गटाचे हिंदूत्व केवळ विरोधकांवर हल्ला करण्यासाठी आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कुंभस्नान न केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी स्नान केले का? त्यांच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे का? भाजप आणि आरएसएस हिंदूत्वाचा कळस असल्याचा दावा करतात, मग त्यांचे प्रमुख नेते महाकुंभाला गेले नाहीत. उत्तर प्रदेशात सत्ता असूनही भाजपच्या मंत्र्यांनी कुंभस्नान केले नाही. हिंदूत्वाची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार फक्त शिंदे आणि भाजपला आहे का?
Nitin Gadkari : गुरूंच्या उपस्थितीत धापेवाड्याच्या मेकओव्हरची मुहूर्तमेढ
धर्माच्या नावावर राजकारण
एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला, पण त्यांनी मोदी-शहा किंवा मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली नाही. हे स्पष्ट आहे की भाजपच्या हिंदूत्वाचे नियम फक्त विरोधकांसाठी आहेत. सत्ताधारी नेत्यांसाठी वेगळे नियम, विरोधकांसाठी वेगळे हीच भाजप-शिंदे गटाची नीती आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही उडी घेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आता वीर सावरकर यांच्या विरोधकांसोबत आहेत,असे वक्तव्य करून हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पण खुद्द भाजपचे अनेक नेते महाकुंभात का गेले नाहीत, यावर त्यांनी मौन बाळगले.
श्रद्धेचा फक्त खेळ
भाजप आणि शिंदे गटाच्या हिंदूत्वाच्या दाव्याला ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे हिंदूत्व प्रेम फक्त सोयीचे आहे. लोकांना भावनिक करून मते मिळवण्यासाठी हिंदूत्वाचा वापर केला जातो. पण प्रश्न विचारला की सत्ताधाऱ्यांना गप्प राहण्याची गरज वाटते. भाजप आणि शिंदे गटाने हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्ले करणे बंद करावे. जर हिंदूत्व हे श्रद्धेचा विषय असेल, तर तो सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. भाजप आणि आरएसएससाठी वेगळे आणि विरोधकांसाठी वेगळे असे दुटप्पी हिंदूत्व जनतेने नाकारले पाहिजे.
