
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमना प्राथमिक शाळेचा पाहणी दौरा केला.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये अचानक भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. त्यांच्या या भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा सळसळता झरा निर्माण झाला. विशेष म्हणजे, उबाळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कशिश ठाकूरने कवितासादरीकरण करून मंत्र्यांचे लक्ष वेधले.
उबाळी गावातील प्राथमिक शाळेत सकाळच्या शालेय प्रार्थनेदरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेची पाहणी केली. शाळेच्या ओट्यावर उभ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांची विचारपूस केली. मुख्याध्यापिका विजया गोतमारे यांनी शाळेची अचूक माहिती मंत्र्यांना दिली. तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनी कशिश ठाकूरने स्वतःहून पुढे येऊन पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम्! ही कविता सादर केली. तिच्या सादरीकरणाने शाळेतील वातावरण भारावून गेले आणि तिसरीच्या निरागस भावविश्वाचा मंत्र्यांनी अनुभव घेतला.

अडचणी आणि सुधारणा जाणून घेतल्या
दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेतील अडचणी विचारून त्या नोंद केल्या. शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मुख्याध्यापिका आणि शिक्षकांशी चर्चा केली. कळमेश्वर तालुक्यातील नगर परिषदेच्या शाळेतही त्यांनी भेट दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची माहिती घेतली आणि चर्मरोगासारख्या आजारांवर उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व जागृत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षणाबद्दल संवाद साधला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे गणिताचे ज्ञान तपासण्यासाठी डिजिटल बोर्डचा वापर करून प्रश्न सोडवण्यास लावले. विद्यार्थ्यांची उज्ज्वल प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या कौतुकाने विद्यार्थी अधिक उत्साही झाले आणि टाळ्यांच्या गजराने वातावरण दुमदुमले.
माजी गृहराज्यमंत्र्याच्या गावात Pankaj Bhoyar यांची पहिली भेट
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन
शाळेतील हजेरी नोंदणी पुस्तिका तपासून विद्यार्थ्यांची नियमितता पाहिली. शारीरिक स्वच्छतेविषयी चर्चा करताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यावर भर दिला. मिशन नवचेतना प्रकल्पांतर्गत कळमना हिंदी शाळेच्या सुधारणा कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दादा भुसे यांच्या या शाळा भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या भेटीतून त्यांनी केवळ शाळेची प्रगतीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यावरही भर दिला. विद्यार्थ्यांशी असलेल्या त्याच्या संवादाने विद्यार्थ्यांना आपलेपणाची जाणीव झाली. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या भेटींमुळे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण होत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.