
अकोल्यात तापमानाने अक्षरशः कहर केला असून 44 अंश सेल्सियसचा पारा गाठला आहे. या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
सूर्य महाराज रोज सकाळी उठल्यावर आपला ‘हाय तापमान’ मोड ऑन करतात की काय? असा प्रश्न सध्या अकोल्यात अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात घोळतो आहे. अकोल्याच्या तापमानाने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः उकळायला सुरुवात केली आहे. 44 अंश सेल्सियसपर्यंत गेलेला पारा पाहता उन्हाचा तडाखा आता सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे.
तडक्त्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन एक महत्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या वेळेत बदल करत सकाळच्या सत्रातच शाळा भरवण्याचे आदेश त्यांनी निर्गमित केले आहेत. नवीन वेळेनुसार प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11.15 या वेळेत भरतील, तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत पार पडतील. यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उन्हापासून वाचवता येईल आणि उष्माघाताचा धोका टाळता येईल, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या सूचना
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशासोबतच शाळांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी मैदानावर वर्ग घेणे टाळावे, विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली मर्यादित ठेवाव्यात आणि पी.टी. सारखे मैदानी तास काही काळ स्थगित करावेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वर्गांमध्ये पंखे कार्यरत असल्याची खात्री करणे, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि भरपूर पाण्याची व्यवस्था असणे हेही अनिवार्य करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना शक्यतो हलक्या रंगाचे, सैलसर आणि सुती कपडे घालण्याची मुभा द्यावी. तसेच टोपी, गॉगल्स, स्कार्फ यांसारख्या पारंपरिक साधनांचा वापर करून त्यांना उन्हापासून वाचण्याच्या उपायांची माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा निर्णय पालक वर्गात समाधानकारक ठरतो आहे. थोडं लवकर उठावं लागेल, पण मुलांची तब्येत जास्त महत्त्वाची आहे” असं मत अनेक पालकांनी व्यक्त केलं आहे. काही विद्यार्थी मात्र या लवकर शाळेच्या वेळांबद्दल उत्सुक असून, दुपारी भर उन्हात शाळा संपल्यावर लगेच घरी परतता येणार याबद्दल खुश आहेत.
एकंदरीत, जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या झळा कमी करण्यासाठी वेळेवर घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या या तापदायक काळात, शाळा होणार थोडीशी ‘कूल’ आणि विद्यार्थ्यांना मिळणार थोडा आराम. त्यामुळं आता सूर्यावर विजय मिळवण्याचा छोटा प्रयत्न तरी नक्की झालाय.