महाराष्ट्र

Operation Sindoor : बुद्धभूमी शौर्य सैन्याचा, मोदींना फोन शरद पवारांचा

Sharad Pawar : ऑपरेशन सिंदूर यशस्वी होताच पंतप्रधानांचे कौतुक

Author

निशस्त्र पर्यटकांवर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या नेतृत्वाचे व सैन्याच्या शौर्याचे अभिनंदन केले.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या अमानुष अतिरेकी हल्ल्याचा प्रतिशोध घेत भारतीय हवाई दलाने 6 मे रोजी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर दणदणीत हवाई कारवाई केली. या कारवाईत 9 ठिकाणांना लक्ष्य साधण्यात आले आहे. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले आहे.

“ऑपरेशन सिंदूर” असे या प्रचंड कारवाईला सडेतोड नाव देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशात गर्व आणि समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना थेट फोन करून या पराक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्तुळात कौतुक

शरद पवार यांनी या ऐतिहासिक क्षणी सरकारच्या आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधून या निर्णायक कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. देशाच्या सुरक्षेच्या या निर्णायक क्षणी आम्ही सरकारसोबत आहोत, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला आहे. पवार यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याकडून आलेले हे पाठबळ राष्ट्रीय एकतेचे प्रतीक मानले जात आहे.

Nagpur : विदर्भाचे प्रशासन नावानेच नाही, कामगिरीनेही टॉप क्लास

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा समावेश होता. देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि “सरकारने बदला घ्यावा” अशी मागणी जोर धरत होती. नागरिकांच्या भावनांचा आदर राखत केवळ 15 दिवसांत भारतीय हवाई दलाने अचूक नियोजन करून “ऑपरेशन सिंदूर” यशस्वीपणे पार पाडले. या कारवाईचे देशभरातून जोरदार स्वागत होत असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारची राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक असो वा सत्ताधारी, सर्वच नेत्यांनी भारतीय सैन्याच्या पराक्रमास सलाम केला आहे.

राजकीय सकारात्मकता

शरद पवार यांची प्रतिक्रिया ही राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील एकमताचे उदाहरण आहे. देशावर आलेल्या संकटाच्या वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरते. त्यांच्या या भूमिकेमुळे केंद्र आणि विरोधकांमध्ये एक सकारात्मक संवाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑपरेशन सिंदूर ही केवळ हवाई कारवाई नव्हती, तर ती देशाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकारने ज्या पद्धतीने वेगाने आणि ठामपणे उत्तर दिले. त्याला शरद पवार यांनी दिलेले पाठबळ हे राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडवणारे ठरले आहे. भारतीय सैन्याचे हे शौर्य आणि राजकीय एकजूट दोन्ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!