
अकोल्यातील महिलांसाठीची सार्वजनिक शौचालयं ही ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची थट्टा ठरत आहेत. दरवाजे, पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसलेल्या या शौचालयांच्या दुर्दशेवर शिवसेना आक्रमक झाली आहे.
अकोला शहरात जिथे विकासाच्या गप्पा रंगतात, तिथे वास्तव मात्र तितकंच विदारक आहे. एकीकडे ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या घोषणा कानावर पडतात, तर दुसरीकडे अकोल्यातील महिलांसाठीची सार्वजनिक शौचालयं अक्षरशः धोकादायक अवस्थेत आहेत. दरवाजे नाहीत, सीट तुटलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था कोसळलेली आहे. या सगळ्याचा फटका थेट महिलांना सहन करावा लागत आहे. यावर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महिलांसाठीच्या शौचालयात दरवाजेच नसणं ही गोष्ट केवळ लाजिरवाणी नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करणारी आहे. शिवाय, वापरलेलं पाणी साठवण्यासाठी असलेली टाकी फुटलेली असल्याने स्वच्छतेचा मागमूसही नाही. कमला नेहरू नगर, अनिकट, जुना आळशी प्लॉट, राजपूतपुरा, खोलेश्वर आणि संपूर्ण प्रभाग 12 मधील ही स्थिती म्हणजे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचं चित्र आहे.

महापालिका बंद
याच विषयावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. अकोला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे महिलांना शौचालयासाठीही संघर्ष करावा लागत आहे. जर ही स्थिती लवकर सुधारली नाही, तर शिवसेनेतर्फे महापालिका बंदचं तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख रमेश गायकवाड यांनी दिला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, अश्विन नवले आणि शिवसेना कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देत ही दुर्दशा अनुभवली आणि महापालिकेला जाब विचारला. आता बघावं लागेल की महापालिका या आवाजाला किती गांभीर्याने घेतं की यावेळीही नागरिकांचं दुःख गाळातच राहणार?
शहराची दुर्दशा
अकोल्यातील ही परिस्थिती काही नवीन नाही. याआधीही वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्येवर नागरिकांनी आवाज उठवला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात सलग तासन् तास वीज गायब होणं, रात्रीच्या वेळीही अचानक अंधार पसरणं, हे अकोल्याच्या नागरी जीवनाचं वास्तव आहे. आता त्यात शौचालयाच्या दुर्दशेची भर पडल्याने नागरिकांची सहनशक्ती संपत चालली आहे.
विकासाच्या नावाखाली अकोल्याला नेहमीच फक्त गाजर दाखवण्यात आलं आहे. ना वीज आहे, ना मूलभूत सुविधा आणि प्रशासन मात्र गप्प. एकीकडे शौचालयांतील ही दारुण स्थिती, आणि दुसरीकडे अंधारात गुरफटलेलं शहर. महिलांचा अपमान, नागरी हक्कांची पायमल्ली आणि विकासाच्या नावावर फसवणूक, हेच आज अकोल्याचं सत्य आहे.
शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक दिली. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये शहर संघटक सागर, उपशहर प्रमुख भूषण इंदोरिया, उपशहर प्रमुख गणेश गोगे, उपशहर प्रमुख शिवम पुरोहित, उपशहर प्रमुख आकाश दलाल, उपशहर प्रमुख सुमित पनझाडे, उपशहर प्रमुख राजेश दांडेकर, सचिव उमेश लांडगे, उपशहर प्रमुख प्रदीप काशीद, विभाग प्रमुख विशाल धोटे, विभाग प्रमुख चेतन जैन, नीतू गगलवार, रोहन चंदन, नागेश इंगोले, श्याम वाघिले, आकाश पाठक, गोलू बाबर, भानू दास गोंधळेकर, आणि अभिनव शुक्ल आदी शिवसैनिकांचा समावेश होता.