
अकोल्यात शिवसेनेचे दोन्ही गट फुटीच्या टोकावर उभे आहेत. अंतर्गत बंडखोरी, नाराजी आणि नेतृत्वावरील अविश्वासामुळे राजकीय रणभूमी तापली आहे.
एकदा शिवसेना, कायमची शिवसेना” अशी आरोळी देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात आता संभ्रमाची शंभर माळा. अकोल्यात शिवसेनेचे दोनही गट, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सध्या जणू एका राजकीय ज्वालामुखीच्या कडेला उभे आहेत. फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या या दोन्ही गटांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर दिसताच सर्वच पक्षात चुरस वाढली आहे, मात्र अकोल्यातील शिवसेनेचा खेळ मात्र सापशिडीच्या पटावर चालतोय! दोन्ही गटांतील अंतर्गत धुसफूस, नाराजीचे सूर, आणि नेतृत्त्वावरचा विश्वास गमावल्याचे साक्षात्कार जिल्ह्यातील राजकारणाला एका मोठ्या मोडीकडे नेत आहेत.

आघाडीकडे वळण्याच्या तयारीत
शिंदे गटातील संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात शिंदे गटातीलच कार्यकर्त्यांनी उठाव केला आहे. एवढंच नव्हे, तर बाजोरिया यांचा पुतळा जाळण्यापर्यंत कार्यकर्त्यांची नाराजी पोहोचली आहे. आरोप असेही आहेत की, वेळ आल्यास बाजोरिया हेच महाविकास आघाडीकडे वळण्याच्या तयारीत आहेत. अशा नेत्यामुळे शिंदे गटाला नुकसान होत असल्याची भावना पक्षातील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. या गोष्टीने शिंदे गटात खळबळ उडाली असून, बाजोरिया यांच्याविरोधात ‘बंडाची ज्योत’ पेटली आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटातही काही वेगळं चित्र नाही. उद्धव ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी थेट शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. या नेत्यांना ना पक्षश्रेष्ठींचा पुरेसा पाठिंबा, ना संघटनात्मक दिशा. कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता, दुर्लक्षाची भावना आणि संधींचा अभाव. यामुळे ठाकरे गटदेखील ‘तुटक्याच्या तोंडचा घास’ बनण्याच्या मार्गावर आहे. अकोल्यातील शिवसेना गटांची ही स्थिती म्हणजे दोन जहाजं एकाच वादळात सापडल्यासारखी आहे. एक गट दुसऱ्याचे कार्यकर्ते ओढून आपली ताकद वाढवण्याच्या नादात आहे, तर दुसरा गट आपल्या पायावरच कुर्हाड चालवतो आहे.
Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी भाजप, संघाचा मास्टरप्लॅन तयार
अनेक प्रश्न
राजकीय वर्तुळातही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू अकोलाच आहे. अकोला हा भाजपचा गड मानला जातो. शिवसेनेची देखील येथे चांगलीच ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद येथे आता संपते का ? ठाकरे गटाचा वारसा राहील का? शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकतेय का? असे अनेक प्रश्न हवेत झुलत आहेत. जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधक म्हणून कार्यरत असलेले दोन्ही गट सध्या संघर्ष, संशय, आणि सावधगिरीच्या त्रिकोणात अडकले आहेत. फुटीची ठिणगी केव्हा पेट घेईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
शिवसेनेच्या अकोल्यातील भवितव्यावर सध्या प्रश्नचिन्हच नाही, तर भल्यामोठं विस्फोटक वर्तुळ उमटलं आहे. स्थानिक निवडणुकांआधी या वादळाला कोण हाताळतो, कोण गड राखतो, आणि कोण गड गमावतो, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अकोल्यातील शिवसेनेचे हे अंतर्गत ‘द्वंद्व’ केवळ एक जिल्हास्तरीय घटना नसून, संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे समीकरण बनू शकते. एकाच पक्षाचे दोन गट पण दिशाहीनतेने भरकटलेले, असे नागरिकही बोलत आहेत.