
पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरक्षा आणि राजकारणाचा धगधगता धागा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा सावध झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. युद्धबंदीच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ज्यामुळे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत विरोधकांना कठोर शब्दांत उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता भारत ‘नवीन भारत’ बनला आहे. तो फक्त दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना आश्रय देणाऱ्या राष्ट्रांनाही सडेतोड प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. मिलिंद देवरा म्हणाले, शिवसेनेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शूर भारतीय सैन्याचे मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी भारताच्या सीमांचे संरक्षण करताना कोणतीही किंमत न पाहता देशाची प्रतिष्ठा अबाधित राखली. ह्या संघर्षात प्राण गमावलेल्या जवानांना आम्ही कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करतो.

नवा भारत
वृत्तसंस्थेशी बोलताना देवरा यांनी परराष्ट्र धोरणावरील टीकाकारांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. त्यांनी म्हटले, “पाकिस्तानसारख्या देशांनी भारताच्या परराष्ट्र किंवा संरक्षण धोरणात हस्तक्षेप करण्याचा विचारही करू नये. हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील नवीन भारत आहे, सज्ज, सक्षम आणि निर्धाराने भरलेले. जो कोणी भारताच्या सार्वभौमत्वावर आघात करण्याचा प्रयत्न करेल, त्याला योग्य त्या परिणामांचा सामना करावा लागेल.
Harshwardhan Sapkal : कॉंग्रेस संपणं म्हणजे भारताची संस्कृती संपवणं
देवरा यांनी काँग्रेससह इतर विरोधकांनाही कडक इशारा दिला. “राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. जर विरोधकांनी अशा संवेदनशील विषयांवर राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तर जनतेकडून त्यांना तितकेच कठोर उत्तर मिळेल, असे ते म्हणाले. शिवसेनेचे नेते पुढे म्हणाले की, आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे भारताला कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाला बळी पडू देता येणार नाही. सरकारचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण आज अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि आक्रमक बनले आहे.
आक्रमक भूमिका
या वक्तव्यातून मिलिंद देवरा यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करणे म्हणजे देशाच्या एकतेवर प्रश्न उपस्थित करणे होय. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे उघड झाले आहे की भारत केवळ संरक्षणावर प्रतिक्रिया देत नाही, तर धोका ओळखून त्याला रोखण्याची ताकदही बाळगतो. देशातल्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. मिलिंद देवरा यांच्या आक्रमक भूमिकेने सत्ताधारी पक्षाने विरोधकांना ठोस संदेश दिला आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की, विरोधी पक्ष या टीकेला कसा प्रतिसाद देतात आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पुढील राजकीय दिशा कोणती ठरते.