
मुख्यमंत्र्यांच्या “काहीवेळा एखादी घटना घडत असते” या विधानावर परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली.
सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातून विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करायला आणखी एक सापडली. या टिकांना सामोरे जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गट नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
“काहीवेळा एखादी घटना घडते. अशा काही घटनांवरून मुंबई शहराला असुरक्षित म्हणणे चुकीचे आहे. मुंबई सर्वात सुरक्षीत शहर आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर अंबादास दानवे म्हणाले की, या राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकताच समाप्त झाली आहे. याचे द्योतक म्हणजे फडणवीसांचे असंवेदनशील वक्तव्य, असे म्हणत अंबादास दानवे यांनी राज्यातील गुन्हेगारीची लिस्टच वाचून काढली.

Government ला धरले धारेवर
अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करीत महायुती सरकारच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीची यादीच वाचून दाखवली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला. त्यावरुन मुंबई सामान्य माणसासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख, विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतच गोळी मारून हत्या झाली. यासह गुन्हेगारीच्या एवढ्या घटना राज्यात घडल्या आहेत. तरीही सत्ताधारी स्वतःचे अपयश मानायला तयार नाहीत. गुन्हेगारी घटनांवर करवाई करण्याउलट असंवेदनशील वक्तव्य करीत आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
अंबादास दानवे पुढे म्हणाले, सुरक्षितता असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. परंतु राज्यात सुरक्षित आहे तरी कोण ? बॉलिवुड अभिनेता सुरक्षित नाही. पुण्यातील ऑफिसात जाणारी बहीण सुरक्षित नाही. सरपंच सुरक्षित नाहीत, विद्यार्थी देखील सुरक्षित नाहीत. पोलिस संरक्षण असतानाही बाबा सिद्दीकी यांची खुलेआम गोळ्या घालून हत्या झाली. सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करण्यात येतो. वाल्मिक कराड सारखा गुन्हेगार मोठ्या थाटात सीआयडी ऑफिसात स्वतःच्या गाडीने हजर होतो. पोलिस चौकीतच गोळीबार करण्यात येतो. राज्यातील सर्वसामान्य जनतेवर कोयत्याने हल्ले होतात. कधी पोलिसांवर वार करण्याची हिंमत दाखवली जाते. राज्यातील गंभीर गुन्ह्यांची आठवण अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.
जबाबदारी टाळू नका
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, फडणवीस साहेब.. महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेचा मुद्दा वेशीवर टांगला गेला आहे. ‘एखादी घटना घडत असते’ असे असंवेदनशील वक्तव्य करून जबाबदारी टाळू नये. हुशार, अभ्यासू आणि विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील जनतेची यापेक्षा अधिक अपेक्षा नाही, असा खोचक टोलाही अंबादास दानवे यांनी लागवला आहे