
कैलास नागरे यांच्या पाणी हक्कासाठी दिलेल्या बलिदानाचा सन्मान राखत, शिवसेनेने आर्थिक मदत, शासकीय निर्णय आणि ठोस आंदोलनाच्या रूपाने संघर्षाला नव्या उंचीवर नेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळ गावात शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे कैलास नागरे यांच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्राला जागं केलं आहे. त्यांच्या या त्यागाला सलाम करत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. या भेटीत त्यांनी गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत पाणी प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली आणि त्यांच्यासोबत भावनिक बंध जोडला. त्यांनी पाणीप्रश्नी उभारलेल्या संघर्षाला सलाम करत 14 गावांच्या सिंचनासाठी सरकारदरबारी ठोस भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, या आशयाची ग्वाही देत 10 एप्रिलच्या आत मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Prataprao Jadhav : कायद्याच्या कचाट्यातून कुणाल कामरा सुटणार नाही
कर्तव्यनिधीच्या माध्यमातून आधार
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून पाच लाख रुपयांचा कर्तव्यनिधी नागरे कुटुंबीयांना सोपवण्यात आला. या निधीच्या माध्यमातून नागरे कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा निधी केवळ मदत नाही, तर शिवसेनेची कुटुंबीयांप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी कैलास नागरे यांच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी त्यांची मागणी होती.
Sudhir Mungantiwar : ‛रयतेचं राज्य’ हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द
कुटुंबासाठी न्यायाची मागणी
कैलास नागरे यांचे बंधू गणेश नागरे यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप केला. गावातील पाणीप्रश्न आठ किलोमीटर दूरवरून सोडवण्याची चर्चा केली जात आहे, मात्र फक्त 110 मीटर चारणी खोदली तरी गावात पाणी पोहोचेल हे नकाशाच्या आधारे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे गावकऱ्यांना अजूनही पाण्यासाठी झगडावे लागत आहे, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
कैलास नागरे यांच्या बहिणीने आपल्या भावनांचा कडवट सूर लावला. नेते फक्त भेटी देऊन जात आहेत, पण आमच्या कुटुंबाला आधार देण्यास कोणीही तयार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कुटुंबाच्या आर्थिक आणि मानसिक स्थैर्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारी घ्यावी, अशी त्यांची मागणी होती.
गावकऱ्यांचा आक्रोश
शिवसेनेच्या जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांनी स्व. कैलास नागरे यांच्या बलिदानाची दखल घेतली आहे. ही केवळ आत्महत्या नाही, तर हा पाणी हक्कासाठी दिलेला बलिदान आहे, हे अधोरेखित करत, शिवसेना या लढ्यात शेवटपर्यंत कुटुंबासोबत उभी राहील, असे जालिंदर बुधवत यांनी स्पष्ट केले.
गावकऱ्यांनी नदी जोड प्रकल्प हा केवळ दिखावा आहे असे ठणकावले. सरकारकडून लांबवरून पाणीपुरवठ्याची योजना आखली जात असली तरी, फक्त 110 मीटर पाईप टाकले तरी हा प्रश्न सुटू शकतो हे गावकऱ्यांनी दाखवून दिले. त्यामुळे सरकारने पाणीप्रश्नी त्वरित निर्णय घ्यावा आणि नागरे यांच्या बलिदानाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
संघर्षाला पाठिंबा
शिवसेना सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी लढते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाची शिकवण शिवसेनेने येथे कृतीत उतरवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, नागरे कुटुंबीयांना कर्तव्यनिधी देऊन शिवसेनेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कैलास नागरे यांच्या बलिदानाने सुरू झालेला हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्राचा लढा बनला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात आणि अन्य नेत्यांनी याला ठोस स्वरूप दिले आहे. 14 गावांना पाणी मिळेपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहील, आणि नागरे कुटुंबीयांना सामाजिक व आर्थिक आधार देण्याची जबाबदारी शिवसेना पार पाडेल.