
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांसाठी अनेकदा धावून गेले आहेत. त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील चालवत आहेत. कल्याण-डोंबीवलीतील सुमारे साडेसहा हजार परिवारांनी डॉ. शिंदे आपल्या डोक्यावरील छत्र वाचविण्यासाठी आता मदत करणार आहेत.
अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. अशात स्वप्ननगरी मुंबईत एखाद्याचं छोटसं घर होणं म्हणजे त्याच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं आहे. मुंबईतील कल्याण-डोंबीवली परिसरात राहणाऱ्या सुमारे साडेसहा हजार लोकांच्या डोक्यावरील छतावर संकट घोंघावत आहे. या सर्व नागरिकांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे न्याय मंदिरात नव्यानं दाद मागणार आहे. एकही कुटुंब रस्त्यावर येऊ नये, यासाठी डॉ. शिंदे या लोकांना नव्यानं याचिका दाखल करण्यासाठी मोठी मदत करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींमधील साडेसहा हजार कुटुंबीयांना बेघर होण्याची भीती सतावत आहे. त्यांच्या डोळ्यांत सध्या अश्रू आहेत. मनामध्ये असुरक्षितता आहे. सतत त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे. आपलं घरटं तर मोडलं जाणार नाही ना? ही चिंता त्यांना सतावत आहे. या 65 इमारतींबाबत अलीकडेच उच्च न्यायालयानं निकाल दिला. त्यामुळं येथे राहणाऱ्या साडेसहा हजार परिवारांच्या काळजाचा ठोका सध्या चुकला आहे. या सर्व परिवारांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलासा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला रस्त्यावर येऊ देणार नाही, असा शब्द डॉ. शिंदे यांनी त्यांना दिला आहे.

Mallikarjun Kharge : भाजपला देण्यासाठी टक्कर, काँग्रेस चालवत आहे नवे चक्कर
सगळं काही सामान्सांसाठी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिलेल्या चुकीच्या परवानगीमुळं या भागात राहणारे सर्वसामान्य संकटात सापडले आहेत. सुमारे साडेसहा हजार लोकांची फसवणूक झाली. संबंधित बिल्डर आणि प्रशासन यासाठी दोषी आहे. त्यामुळं या नागरिकांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे आता पुढे सरसावले आहेत. सर्व 65 इमारतींमधील लोकांचं स्वप्नातील घर सुरक्षित राहावं म्हणून डॉ. शिंदे तज्ज्ञ विधिज्ञांची फौज उभी करणार आहेत. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कुटुंबांना दिली आहे.
महाराष्ट्रातील जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या मनातील कळवळा अनुभवला आहे. संकटात सापडलेल्या अनेकांच्या मदतीला शिंदे धावून गेल्याचं दिसलं. अनेक अपघातग्रस्तांचे प्राण एकनाथ शिंदे यांनी स्वत: वाचविले. त्यांचाच हा वारसा आता डॉ. श्रीकांत शिंदे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांच्या या प्रयत्नातून दिसत आहे. संकटसमयी अनेकांनी एकनाथ शिंदे हे देवदूतासारखे आल्याचं अनुभवलं. आता डॉ. श्रीकांत शिंदे देखील सामान्य कल्याण-डोंबीवलीकरांसाठी न्याय मंदिराची पायरी चढणार आहे. कल्याण-डोंबीवलीतील हा मुद्दा राजकारणाचा भाग नाही. हा प्रश्न साडेसहा हजार कुटुंबांच्या अस्तित्वाचा आहे. आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहोत. त्यांचा संघर्ष सोपा करण्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देणार असल्याचं डॉ. शिंदे यांनी यानिमित्तानं सांगितलं.