
अकोल्यात दिवसेंदिवस समस्यांचे पहाड निर्माण होत आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रखडलेल्या प्रकल्पांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पायाभूत सुविधांची दयनीय स्थिती झाली आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे.
अकोला जिल्ह्यातील नागरी सुविधांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहराचा विकास आणि शहरीकरण मोठ्या वेगाने होत असताना, मूलभूत सुविधा मात्र मागे पडत आहेत. रस्त्यांची खराब स्थिती, अपूर्ण ड्रेनेज व्यवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे अकोलावासीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अकोला शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अनेक भागांत खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोरगव्हाण रोड, टापरगव्हाण रोड, जठारपेठ, रामदासपेठ, सिव्हील लाईन, आणि मनोरा रोड या परिसरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना अत्यंत संथ गती मिळत आहे. पावसाळ्यात या खड्डेमय रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची भीती आहे. संबंधित यंत्रणांकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे डागडुजीचे उपाय केले जात असून, नागरिकांना दीर्घकालीन समाधान मिळत नाही.

Parinay Fuke: यांच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांना मोठा दिलासा
नागरीक त्रस्त
शहरातील पावसाळी पाणी आणि सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असलेली ड्रेनेज यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत आहे. सिव्हील लाईन, रामदासपेठ, जेल रोड, डाबकी रोड आणि अकोला बायपास या भागांमध्ये ड्रेनेजच्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. पुरेशा नियोजनाच्या अभावामुळे पावसाळ्यात अकोलामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम राहतो. अनेक वेळा ड्रेनेज लाईनची सफाई न केल्याने सांडपाणी रस्त्यावर येते आणि दुर्गंधी पसरते.
अकोला हे महाराष्ट्रातील निवडक स्मार्ट सिटी प्रकल्पांत समाविष्ट असलेले शहर आहे. मात्र, या योजनेअंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणा, आधुनिक बस स्टँड, डिजिटल व्यवस्थापन आणि स्मार्ट ट्रॅफिक नियंत्रण यांसारखे प्रकल्प रखडले आहेत. निधीअभावी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अकोला स्मार्ट सिटीचे स्वप्न अद्याप पूर्णत्वास जाऊ शकले नाही.
वाहतुकीची कोंडी
अकोला शहरात दिवसेंदिवस वाहतुकीच्या समस्येत वाढ होत आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होते. सिव्हील लाईन, जठारपेठ, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रोड आणि बस स्टँड परिसरात अत्यंत गर्दी पाहायला मिळते.
शहरात वाढते खासगी वाहने आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अपुऱ्या पार्किंग सुविधा, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनियंत्रित असल्याने वाहतुकीस अडचण येते. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपूल, बायपास रस्ते आणि ट्रॅफिक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल लावण्याचे नियोजन झाले होते, पण हे प्रकल्पही रखडले आहेत.
प्रशासनाचे अपयश
शहरातील पायाभूत सुविधांवर सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या सुटत नाहीत. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अकोलाच्या पायाभूत विकासासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.
अकोला शहराचा विकास झाला असला तरी पायाभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. नागरिकांनी या समस्यांवर आवाज उठवून प्रशासनाला जबाबदार धरले पाहिजे. शहराच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर अकोलाची स्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्याप्रकारे बाहुबली या चित्रपटातील हिरोने महादेवांचे शिवलिंग उचललेली होते. त्याचप्रमाणे अकोल्यातील समस्यांचा भार कोण उचलणार ? जिल्ह्यातील प्रशासनाला शिस्त कोण लावणार? असा प्रश्नही उपस्थित होतो.