महाराष्ट्र

Buldhana : माझ्या लेकरांना सांभाळा, मी हरलो…एका हतबल बापाची अखेरची विनवणी

Maharashtra : पुरस्कार घेणारे हात शेवटी आत्महत्येसाठी जोडावे लागले

Author

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारलाच जबाबदार धरत मुलांच्या भविष्यासाठी मुख्यमंत्र्यांना पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली.

‘आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. शेवटी, या परिस्थितीला मी कंटाळलो आहे… माझ्यावर पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंदस्वामी धरणात विसर्जित करा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे.’ ही वाक्यं वाचताना हृदय हेलावून जातं, डोळ्यात अश्रू येतात. पण महाराष्ट्र शासनाच्या कठोर हृदयाला मात्र अजूनही पाझर फुटलेला नाही. ही केवळ एक सुसाईड नोट नाही, तर एका हताश, निराश, पण आपल्या जमिनीवर अखेरपर्यंत लढणाऱ्या बुलढाण्याच्या युवा शेतकऱ्याचा शेवटचा आक्रोश आहे. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या या कष्टकरी तरुणाला शेवटी सरकारच्या बेफिकिरीने मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडले.

संपूर्ण देश होळीच्या रंगात न्हाऊन निघत असताना, बुलढाण्यातील एका शेतकरी कुटुंबावर मात्र काळोखी दु:खाची छाया पसरली. जिथे गुलाल उधळला जातोय, तिथे काळजाला चिरणाऱ्या हंबरड्यांचे आवाज येत आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळी गावात एक कुटुंब आपल्या कर्ता पुरुषाला गमावून सुन्न आहे. महाराष्ट्राच्या मातीतील पोशिंद्याला आत्महत्या करावी लागते, ही शासन व्यवस्थेची शोकांतिका नाही का?

Parinay Fuke : आरोपांच्या पिचकारीनं नेते अन् खंडणीखोर एजन्ट्सची होळी

संघर्षाचे आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील हजारो शेतकऱ्यांसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे, यासाठी गेले अनेक महिने संघर्ष सुरू होता. मात्र, या संघर्षाची किंमत एका तरुण शेतकऱ्याने स्वतःचे प्राण गमावून चुकवली. शासनाच्या फोल ठरलेल्या आश्वासनांमुळे संतप्त आणि हतबल झालेल्या कैलास अर्जुन नागरे या तरुण शेतकऱ्याने 12 मार्च रोजी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. ही काळजाला चिरणारी घटना 13 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली.

कैलास नागरे यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पासमोर डिसेंबर महिन्यात आणि त्यानंतर जानेवारी महिन्यातही त्यांनी नेतृत्व करत उपोषण केले. अंढेरा मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असूनही, खडकपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा असताना, प्रशासन मात्र डोळेझाक करत होते. ‘आमचं आयुष्य सुकलं तरी चालेल, पण जमिनी सुकू नयेत’ हीच भावना मनाशी धरून त्यांनी कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी आर्त मागणी लावून धरली.

Mahakumbh : राज ठाकरेंच्या ‘गंगाजल’ टीकेवर, नितेश राणेंचा ‘संध्याजल’ने हल्ला

महाराष्ट्राच्या विकासाची अंतयात्रा

येत्या पावसाळ्यात पुन्हा कोरड्या विहिरी आणि करपणाऱ्या पिकांच्या भीतीने आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्याला शेवटी सरकारच्या असंवेदनशीलतेने गाठलं. वारंवार आश्वासनं देऊन प्रशासनाने वेळकाढूपणा केला. आणि जेव्हा शब्दांना कृतीची साथ मिळाली नाही, तेव्हा एका शेतकऱ्याचा आत्मविश्वास गमावला गेला, त्याच्यासोबतच त्याचा जीवही. कैलास नागरे यांनी 12 मार्च रोजी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. त्यांच्या कपड्यात सापडलेली चार पानी सुसाईड नोट म्हणजे केवळ एक निराशेची हाक नाही, तर महाराष्ट्राच्या फसलेल्या विकासाची अंत्ययात्रा आहे.

माझ्यावर पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंदस्वामी धरणात विसर्जित करा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे. ही वाक्यं वाचून काळीज चर्रर्र होतं, पण सरकार मात्र अद्यापही गप्प आहे. ज्या हातांनी मातीला सोनेरी घाम दिला, ते हात आता थंड झाले. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणारा, राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरवलेला हा युवा शेतकरी आज नाही. कारण, त्याच्या जगण्यासाठी लागणारं साधं पाणी त्याला मिळालं नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!