
महाराष्ट्राने शालेय शिक्षणात मूल्याधारित क्रांतीची नांदी केली आहे. ‘मूल्यवर्धन’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी विद्यार्थ्यांना चारित्र्य व नैतिक शिक्षणाचा सशक्त आधार मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात “मूल्यवर्धन” या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 वर्षाला पूरक असलेल्या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे महाराष्ट्र शिक्षणाच्या नवविचारांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक लाख शासकीय व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी वीपर्यंत मूल्यशिक्षणाचा प्रसार होणार आहे. पाच लाख शिक्षकांच्या मदतीने तब्बल एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचवले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, नैतिक मूल्ये, जबाबदारी आणि सकारात्मक नागरिकत्वाची जाणीव निर्माण होणार आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी या उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करत 2025 ते 2030 पर्यंतच्या कालावधीसाठीचा पंचवार्षिक आराखडा देखील मांडला. मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थीनिर्देशित, अनुभवाधारित आणि ज्ञानरचनावादावर आधारित आहे. त्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे.

दूरदृष्टीचा निर्णय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्याधारित शिक्षणाला दिलेल्या प्राधान्यानुसार हा उपक्रम संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे. महाराष्ट्राने आज जे बीजारोपण केले आहे, ते शिक्षण क्षेत्रात एक व्यापक मूल्यक्रांतीचे स्वरूप धारण करेल आणि इतर राज्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. राज्य शासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक व्यापक व प्रभावी मूल्यशिक्षण राबवणारे अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाणार आहे. हे उपक्रम केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता भावी पिढीला नैतिकदृष्ट्या सशक्त, जबाबदार आणि देशभक्त नागरिक घडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत.
Sanjay Meshram : काँग्रेस आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
मूल्यवर्धन उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, प्रामाणिकपणा, सहिष्णुता, जबाबदारी, सहकार्य आणि राष्ट्राभिमान या मुल्यांचे बीज रोवणारा उपक्रम आहे. हा उपक्रम ज्ञानरचनावादावर आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या नैतिक व चारित्र्यात्मक विकासावर केंद्रित आहे. विविध सृजनशील व सहभागी पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये समंजस आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाने ठेवले आहे. अध्यापन व अध्ययान प्रक्रियेत मूल्यांची अंगभूत गुंफण होण्यासाठी या उपक्रमाचे सखोल नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाच्या दर्जात सातत्याने सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर्षाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, गुणवत्ता वाढ, सर्वसमावेशकता, आणि मूल्याधारित शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील शाळांमध्ये केवळ ज्ञानाधारित नव्हे तर मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. “मूल्यवर्धन” उपक्रमामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण, परिणामकारक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार आहे.