
राज्यात आता भाजप सरकार सोशल मीडियावर आक्रमक होणार आहे. भाजप नेत्यांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार. सोशल मीडियाच्या गैरवापरायला आळा घालण्यासाठी मोहीम.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात सातत्याने सोशल मीडियावर अश्लील आणि आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलने आघाडी घेतली असून, अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यभरात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या विविध नेत्यांविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि अश्लील मजकूर पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सोशल मीडिया सेलने यावर गंभीर दखल घेतली असून, अशा पोस्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ज्या सोशल मीडियाच्या जोरावर नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली होती. त्याच सोशल मीडियावर त्याच्या विरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कारवाई होणार आहे. पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणीही राजकीय मतभेद व्यक्त करण्यासाठी अश्लीलतेचा आणि बदनामीचा आधार घेऊ नये.

तक्रारींचा धडाका
भाजपच्या नेत्यांविरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या प्रमुख शहरांमध्ये पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या असून, काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनानेही तत्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही सोशल मीडिया युजर्सना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, तर काही जणांकडे चौकशी सुरू आहे. काही पोस्ट हटविण्यात आल्या असून, या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडिया सेलचा इशारा
भाजपच्या सोशल मीडिया सेलने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर कुणीही पक्षाच्या नेत्यांविरोधात बदनामीकारक, खोट्या किंवा अश्लील पोस्ट करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियाचा वापर मतभेद मांडण्यासाठी असला तरी तो सभ्यतेच्या चौकटीत राहून करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. भाजपविरोधी नेत्यांनी या मोहिमेवर आक्षेप घेतला असून, ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भाजपच्या वतीने हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. ही कारवाई फक्त सोशल मीडियावर होणाऱ्या गैरवापराला आळा घालण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. राजकीय वातावरणाचा हा वाद आता कोणत्या टप्प्यावर जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.