
नागपूर शहर आकाशात झेपावण्यास सज्ज असून एव्हिएशन उद्योगाचं नवं केंद्र म्हणून पुढे येत आहे. मात्र दुसरीकडे, ग्रामीण भाग विकासाच्या रडारवरही नसल्याने तेथील तरुण बेरोजगारीत अडकले आहेत.
एकीकडे नागपूरमध्ये विमानांची निर्मिती, देखभाल आणि हेलिकॉप्टर कारखान्यांच्या उद्घाटनाचा जल्लोष. तर दुसरीकडे, त्याच जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भागात रोजगाराच्या शोधात असहाय्य ठरलेली तरुणाई. नागपूरची उपराजधानी म्हणून वाटचाल आता ‘एव्हिएशन हब’कडे निश्चितपणे होत आहे. मात्र या विकासाच्या वादळात ग्रामीण नागपूर उपेक्षितच राहिला आहे.
अलीकडील काळात नागपूरच्या मिहान व विशेष आर्थिक क्षेत्रात (SEZ) देशातील विमान उद्योग मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. ‘मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि.’ यांचा सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प हे याचे सर्वोत्तम उदाहरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या करारामुळे नागपूर हे देशातील अग्रगण्य एव्हिएशन क्लस्टर म्हणून पुढे येत आहे.

डसॉल्ट-रिलायन्सचा करार
जगप्रसिद्ध डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यात फाल्कन-2000 जेट्सच्या निर्मितीचा करार झाला आहे. या जेट्सचे उत्पादन नागपुरातच होणार आहे, यामुळे मिहान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्त्व प्राप्त झाले आहे. या जेट्सची मागणी भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात असून, यामुळे हजारो नवीन रोजगार संधींचा मिहानला फायदा होईल.
नागपूरच्या भौगोलिक मध्यवर्ती स्थानाचा फायदा घेत एअर इंडिया आणि एएआर-इन्दमार यांनी नागपूरमध्ये विमान देखभाल आणि दुरुस्ती केंद्रे (MRO) सुरू केली आहेत. देशभरातील विमान कंपन्यांसाठी नागपूर ही ‘सर्वात सोयीस्कर’ दुरुस्ती केंद्र बनले आहे. शासनानेही या भागात मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे एव्हिएशन कंपन्यांची गुंतवणूक वाढली आहे.
Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत
संत्र्याचं सोनं शहरात
नागपूरची ‘संत्र्यांची राजधानी’ म्हणून ओळख असूनही, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र शहरात स्थापन झालेत. पतंजली फूड पार्क दररोज 800 टन संत्र्यांवर प्रक्रिया करतो, पण तो मिहानमध्ये असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांना वाहतूक खर्चाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. जर हे उद्योग शेतकरी-प्रधान तालुक्यांत वसवले गेले असते, तर स्थानिकांना रोजगार, बचत आणि विकासाचे द्वार खुले झाले असते.
नागपूर जिल्ह्याची जवळपास निम्मी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, तरीसुद्धा 13 पैकी 10 तालुक्यांमध्ये एकही मोठा उद्योग नाही. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर हे काही अपवाद. बाकी तालुक्यांत केवळ शेतकीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. उदाहरणार्थ, काटोल आणि सावनेर हे मोठे तालुके असूनही येथे उद्योग नाहीत. रामटेकसारख्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यालाही आवश्यक पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.
मिहान क्षेत्रातील औद्योगिक उन्नतीसोबतच शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्येही नागपूर आघाडीवर आहे. IIM, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, AIIMS, मेडिकल कॉलेज, खासगी वैद्यकीय संस्थांचा बोलबाला यामुळे शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्यसेवा उपलब्ध आहे. मात्र याच सेवा ग्रामीण भागात अपुऱ्या व दुर्लक्षितच आहेत.
गावात बेरोजगारी
जिल्ह्यात एकूण 2021 नोंदणीकृत उद्योगांपैकी 1014 सुरू, आणि त्यापैकी बहुतांश नागपूर शहरात. एकूण 74 हजार 130 कामगारांपैकी 85 टक्के शहरातच कार्यरत आहेत. म्हणजेच ग्रामीण भागात उपलब्धी नगण्य आहे. शहरात विकासाची रेलचेल असताना गावाकडे रोजगाराच्या नावाने शून्य.
विमानं, हेलिकॉप्टरं, जेट्सचं उत्पादन ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. पण, विकासाचा केंद्रबिंदू शहरापुरता नको. ग्रामीण भागातही उद्योग, शिक्षण आणि आरोग्य सेवांची समान गुंतवणूक हवी. नाहीतर शेतकऱ्यांच्या मुलांना विमान उडताना पाहण्याचा आनंद असेल, पण त्यात आपला सहभाग असण्याचं स्वप्न कधीच अपूर्णच राहील.