
सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद न मिळाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत विधिमंडळात ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी…’ हे गाणं गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्ट केलं की ते नाराज नाहीत, आश्चर्यचकित आहेत आणि जनसेवेचं कार्य असंच सुरू राहील.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं नाटक आता कुणालाच नवं राहिलेलं नाही. सत्तेच्या खुर्चीभोवती घुमणाऱ्या चर्चा, आघाड्या-युतींचे ताणतणाव आणि नेत्यांचे मनस्ताप हे रोजचं चित्र झालं आहे. महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटात म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत ‘कोल्ड वॉर’ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सुधीर मुनगंटीवार हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात फिरू लागला होता. पण सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या खास शैलीत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी विरोधकांचं तोंड बंद करताना थेट विधानसभेत गाणं गायलं आणि सिद्ध केलं की ते नाराज नाहीत, तर त्यांचं लक्ष नेहमीच जनतेच्या हितावर केंद्रित आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं’ हे गाणं गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हे गाणं त्यांनी केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निवडलं. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कौतुकाची लाट उसळली. त्यांनी सांगितलं की, ‘लोकांना वाटतं मी नाराज आहे, पण खरंतर मला थोडी खंत आहे. जेव्हा मी काही बोलतो, तेव्हा लगेच म्हणतात की मंत्रीपद मिळालं नाही म्हणून हे बोलतोय.’ पण सुधीर यांनी हे गाणं निवडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं. त्यांचे नेते नितीन गडकरी यांचं हे आवडतं गाणं आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी हे सादरीकरण केलं. ‘कधी कधी पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहात का? तेव्हा मला म्हणावंसं वाटतं – तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं,’ असं म्हणत त्यांनी आपल्या हजरजबाबीपणाचा परिचयही करून दिला.

Parinay Fuke : एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधानपरिषदेत गाजवणारा विदर्भाचा आमदार
जनतेच्या हितासाठी तटस्थ
सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मंत्रीपद ही कधीच प्राथमिकता राहिलेली नाही, हे त्यांच्या कृतीतून आणि बोलण्यातून नेहमीच दिसतं. अधिवेशनादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका मांडली. जिथे सरकार चुकतं, तिथे त्याला धारेवर धरायलाही ते मागे हटले नाहीत. महायुती सरकारसाठी सुधीर हे एक महत्त्वाचे नेते आहेत, कारण त्यांचा अनुभव आणि जनतेशी असलेलं नातं पक्षाला मजबुती देतं. त्यांनी सांगितलं की, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी माझं काम थांबवणार नाही. माझी लढाई ही जनतेच्या हक्कांसाठी आहे, खुर्चीसाठी नाही. त्यांच्या या विधानाने त्यांचे समर्थक भारावून गेले.
सुधीर मुनगंटीवार यांचं राजकारण हे नेहमीच लोककेंद्रित राहिलं आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात आणि राज्यभरात अनेक विकासकामांना चालना दिली आहे. आजही ते जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आघाडीवर असतात. विधानसभेत गाणं गाऊन त्यांनी आपली वेगळी ओळख तर निर्माण केलीच, पण त्याचबरोबर आपल्या नेत्यांप्रती असलेली निष्ठा आणि जनतेच्या हिताप्रती असलेली बांधिलकीही दाखवून दिली. त्यांच्या या अनोख्या शैलीमुळे विरोधकांनाही त्यांच्यावर टीका करताना दहावेळा विचार करावा लागतो.