
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेसमध्ये सामील झाला तर मुख्यमंत्रीपद देणार, अशी ऑफर दिली. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी प्रतिक्रिया देत आधी जबाबदारी पार पाडा, असा टोला पटोले यांना लगावला. त्यानंतर आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रतिक्रीया देत काँग्रेसला टोला लगावला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मला वाटतं हा धुलिवंदनाचा जोक असावा. काँग्रेसकडे केवळ 46 आमदार आहेत. तरीही, त्यांनी राज्याच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना अशा प्रकारच्या ऑफर देणं हास्यास्पद आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही जबाबदारीनं आणि प्रभावीपणे आपली भूमिका बजावत आहेत. अशा यशस्वी नेतृत्वाला शंका आणि संभ्रमाच्या वातावरणात ढकलण्याचा हा प्रयत्न आहे,” असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मुनगंटीवार पुढे म्हणाले, “जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही. त्यामुळे तुम्हीही त्यांना गंभीरपणे घेऊ नका. अशा बिनबुडाच्या वक्तव्यांमुळे फक्त राजकीय वातावरण गढूळ होतं, पण त्याला कोणताही आधार नसतो.”

Holi 2025 : कर्तव्य अन् रंगांची जोडी, नागपूर पोलिसांची अविस्मरणीय होळी
कोर्टाच्या निरीक्षणावरही प्रतिक्रिया
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवरही मुनगंटीवारांनी भाष्य केले. त्यांनी कोर्टाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, कोर्टाने हे निरीक्षण कोणत्या आधारावर नोंदवलं, हे समजलेलं नाही. पण निवडणुका घ्यायच्या की नाही, याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. जर फक्त खर्च वाचवण्यासाठी निवडणुका टाळायच्या असतील, तर उद्या कोर्ट म्हणेल का की पाच वर्षांऐवजी दहा वर्षांनी निवडणुका घ्या?
शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटलांनी पक्ष बदलण्याचा कधीही विचार केलेला नाही. मात्र, वारंवार अशा अफवा पसरवल्या जातात आणि एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो. ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. संयमित लोकशाही जर स्वैराचारी पद्धतीने चालली, तर भविष्यासाठी ते चांगलं संकेत नाही, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न
सरकार गंभीर
शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत मुद्दा असल्याचे नमूद करताना मुनगंटीवार म्हणाले, “एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विधानसभेत यावर संपूर्ण एक दिवस चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं.”
काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवर जोरदार हल्लाबोल करतानाच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत मुनगंटीवार यांनी भाजपची गंभीर भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे कशी जुळतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.