
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर आपले विचार मांडले.
‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होणारे भारतीय संविधान हे केवळ एक कायद्यांचे पुस्तक नाही, तर देशाच्या आत्म्याचा आरसा आहे. लोकशाही, समता, बंधुता आणि सार्वभौमता यांचे मूळ तत्त्व यातून स्पष्ट होते. हे संविधान आपल्याला केवळ हक्कच देत नाही, तर कर्तव्यांची जाणीवही करून देते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी याच संविधानाचे मार्गदर्शन आवश्यक आहे, असे मत विधानसभेत व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत भारतीय गणराज्याच्या 75 वर्षानिमित्त भारताच्या संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा झाली. या चर्चेत अनेक आमदार आणि मंत्र्यांनी सहभाग घेतला. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही संविधानावर आपले विचार मांडत, त्याच्या शक्ती आणि संभावनांवर प्रकाश टाकला.

जबाबदारीची जाणीव
भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल साजरी करताना, मुनगंटीवार यांनी संविधानाचा गौरव करण्याबरोबरच त्याच्या जबाबदारीच्या भानाचीही जाणीव करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संविधान फक्त एक दस्तऐवज नसून, तो आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. संविधानाच्या 50 वर्षांच्या प्रवासानंतर आपण त्याचे दस्तऐवजीकरण केले, मात्र आता पुढील 100 वर्षांत महाराष्ट्राची आणि भारताची वाटचाल कशी असेल, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
कदाचित माझं पाच जन्माचं पुण्य जास्त असेल की माझा जन्म भारतात झाला त्यातही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात झाला याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. असा वैभवशाली हा देश आहे. आमच्याकडे लोकशाही नवीन नाही चाणक्यापासून आमचा सर्वांचा लाडका शिवबा तो आमच्या हृदयात आहे. आमच्या रक्तांच्या थेंबा थेंबात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं ते रयतेचे राज्य हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द आहे. हे रयतेचे राज्य म्हणजे काय हेच तर संविधान आहे असेही मुनगंटीवार म्हणाले.
Uddhav Thackeray : अधिवेशनाचा एकमेव फायदा; राज्याला मिळाले एक गाणे
प्रगतीच्या दिशेने वाटचाल
संविधानाने दिलेल्या संधींमुळे भारतातील सामान्य नागरिकांनाही मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, असे मुनगंटीवार यांनी विधानसभेत नमूद केले. चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ऑटो रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री बनू शकतो, आणि नागपूरच्या गल्लींमध्ये फिरणारा युवक केंद्रीय मंत्री बनून राष्ट्रीय महामार्ग उभारू शकतो. हे संविधानाचे सामर्थ्यच आहे की, आज भारत प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
संविधान हा केवळ कायद्यांचा संच नाही, तर तो लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, आणि हेच लोकशाहीचे खरे प्रतीक आहे. त्यामुळे संविधान केवळ शब्दांचा समूह नसून, त्यामध्ये देशाच्या प्रगतीची ऊर्जा आणि समाजाला एकसंध करण्याची क्षमता आहे. संविधान बदलण्याचा विषय नाही तर, तो आचरणात आणण्याचा विषय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Nagpur Riots : नुकसानग्रस्तांना सरकारडून सात लाखांचा मदतीचा हात
राज्यघटनेचे महत्व
संविधान साजरे करताना, केवळ औपचारिक उत्सवांपुरतीच श्रद्धा न ठेवता, त्याच्या मूलभूत तत्त्वांनुसार कृती करण्याची आवश्यकता आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट यांसारख्या राष्ट्रीय सणांना आपण संविधानाची महत्ता अधोरेखित करतो, पण त्या मूल्यांची अंमलबजावणी केली नाही, तर त्याचा खरा अर्थ हरवेल.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काही संकल्प करावे लागेल. ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे गीत मी सांस्कृतिक मंत्री असताना निवडला असं सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. हा आपला भाव आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने आपल्या सर्वांना काही संकल्प करावा लागणार आहे भारताला ‘विश्वकप्तान’ बनवण्याचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे.
संविधान ही केवळ एक घटना नाही, तर तो भारतीय संस्कृतीचा पाया आहे. या महान संविधानाने आपल्याला समानता, बंधुत्व आणि लोकशाहीची मूल्ये दिली आहेत. त्यामुळे केवळ त्याचा गौरव साजरा करण्यापेक्षा, त्याचे तत्वज्ञान आचरणात आणण्याची खरी गरज आहे.