
विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. अशात सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरबाबत व्यक्त केलेल्या चिंतेवर विजयवाडी तिवारी यांनी दावा केला होता. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री तथा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यावर आपण फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात हे बोललो होतो, चंद्रपूरमध्ये हळूहळू गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. अधिकाऱ्यांशी बोलताना चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाल्याचा दावा त्यांनी केला. तर सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा पूर्णतः फेटाळला नाही. आपण फक्त एका घटनेच्या संदर्भात बोललो होतो असं ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीडची परिस्थिती किती भयंकर असल्याचं वाटतंय हे दिसून येतंय असं वडेट्टीवार म्हणाले.

गुन्हेगारी वाढत आहे
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जी घटना एका सरपंचासोबत घडली ती अमानवी आहे. मानवतेला लाज वाटणारी तशी घटना चंद्रपूरमध्ये घडता कामा नये. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये हळूहळू कोल माफिया आणि वाळू माफियांची संख्या वाढताना दिसत आहे. पोलिस अधीक्षकाऱ्यांच्याच्या माध्यमातून त्याची माहिती समोर आली त्यावेळी त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज जर या माफियांना अटकाव केला नाही तर उद्या त्याचा परिणाम वाईट होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “बीडच्या एका घटनेबद्दल मी बोललो. आपण ज्यावेळी बिहार म्हणतो त्यावेळी बिहारच्या सगळ्याच गावात तशा घटना घडतात का? सरसकट अशा घटना घडत नाहीत. तशाच अर्थाने बीड जिल्हा बदनाम आहे, असे नाही. माझ्या वक्तव्यामध्ये तसा कोणताही संदर्भ नाही. वडेट्टीवार काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मी कोणत्या अर्थाने बोललो त्याबद्दल मला माहिती आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले