
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात विरोधकांच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी कठोर प्रत्युत्तर दिले आहे. मतदारांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांवर त्यांनी टीका करत हिंदुत्व, विकास आणि काँग्रेसच्या अपयशावरही परखड भूमिका मांडली.
संपूर्ण राज्याचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले असताना, मुनगंटीवार यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही विरोधकांनी निवडणुकीसंदर्भात टीका करत मतं विकत घेतली जात असल्याचा आरोप केला. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत, “हे मतदारांचा अवमान आहे. मतदार कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसतील, पण ते स्वतःच्या मताचा योग्य उपयोग करतात. अशा प्रकारची विधाने हा महाराष्ट्राच्या लोकशाहीचा अपमान आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हिंदुत्व हा केवळ नारा नसून एक जीवनपद्धती आहे, असे सांगत मुनगंटीवार यांनी विरोधकांना फटकारले. मुनगंटीवार म्हणाले, “हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, त्याग, सेवा आणि प्रेम भावना. हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, तर ते आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ हेच खरे हिंदुत्व आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘ब्रँड’ ‘ब्रँड’ ची गोष्ट
देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीही बनू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा एक ब्रँड आहे. ठाकरे यांचा ब्रँड विकास कामांना स्थगिती देण्याचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ब्रँड स्थगिती न देता महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे बनू शकत नाहीत आणि उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस बनू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे याबाबतीत खरे बोलले, असा घणाघाती टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसने ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम आहे. हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे. काँग्रेसची भूमिका ही मूळ काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा अत्यंत वेगळी आहे. जी महात्मा गांधींनी सांगितली त्या भूमिकेच्या दूर काँग्रेस गेली आणि काँग्रेसची गति मंदावली. महात्मा गांधींच्या सत्याच्या ऐवजी सत्तेच्या मागे काँग्रेस पक्ष लागला. त्यामुळे काँग्रेसची ही गती आणि अपयश अपेक्षित असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सरकारने दिलेल्या मॅनिफेस्टो मधील तरतुदी एका वर्षात पूर्ण होऊ शकत नाहीत. सरकार हे पाच वर्षे चालणार आहे. परीक्षाही तीन तासांची असते. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी उत्तर पत्रिका देऊन तीन मिनिटांत त्याची उत्तर पत्रिका हिसकावली, असे कुठेच नसते. त्याचप्रमाणे जाहीरनाम्यात सरकारने सांगितलेल्या तरतुदी या पाच वर्षांच्या आहेत. या सर्व तरतुदी अर्थसंकल्पाद्वारे पाच वर्षांत विभाजित करून सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.