
तरुणाईला नव्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हर्बल हुक्क्यावर बंदीची जोरदार मागणी केली. समाजाच्या स्वास्थ्यासाठी हा गंभीर धोका ठरू शकतो, त्यामुळे तातडीने कठोर पावले उचलण्याचा त्यांचा निर्धार आहे.
कधी काळी रुपेरी पडद्यावर गाजलेल्या “सिगरेट के धुएं को छल्ला बना के” या गाण्याने एका संपूर्ण पिढीला सिगारेट आणि हुक्काच्या धुराचे वेड लावले होते. त्या वेळी हे केवळ एक गाणे होते, पण आज वास्तव वेगळे आहे. तरुण पिढी नव्या स्वरूपातील व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आधी सिगारेट आणि हुक्का पार्लर होते, त्यानंतर ई-सिगारेट्स आल्या, आणि आता हर्बल हुक्का नावाचा नवा सुळसुळाट समाजात वेग घेत आहे. याला आळा घालण्यासाठी आणि तरुणाईला व्यसनाच्या गर्तेतून वाचवण्यासाठी माजी वन, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जोरदार मागणी केली आहे.
मुनगंटीवार यांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. हर्बल हुक्का हा केवळ नावाला हर्बल आहे. त्याचा समाजावर आणि विशेषतः तरुणांच्या आरोग्यावर मोठा घातक परिणाम होत आहे. त्याचे परिणाम आज जरी सूक्ष्म वाटत असले तरी भविष्यात हे संकट गंभीर रूप धारण करणार आहे. त्यामुळे या सामाजिक मायग्रेनवर कायमस्वरूपी इलाज करणे अत्यावश्यक आहे, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

Rahul Gandhi : शिक्षण आरएसएसच्या ताब्यात गेलं, तर देश उद्ध्वस्त होईल
समाजाची फसवणूक
एकेकाळी तरुणाई फॅशन म्हणून सिगारेट ओढत असे, नंतर हुक्का आला, आणि आता हर्बल हुक्काच्या नावाखाली नव्या व्यसनाचा बाजार सुरू आहे. याचे भान ठेवत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवत सरकारने यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा भविष्यात ही एक मोठी समस्या ठरेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हर्बल हुक्का पार्लरची संख्या झपाट्याने वाढत आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत काही व्यावसायिक या व्यवसायाला चालना देत आहेत. ही पार्लर केवळ धंदा नसून, तरुण पिढीच्या अधःपतनाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे यावर कायदेशीर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.
नशामुक्त महाराष्ट्रासाठी निर्णय
राज्यात व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सरकारने ठोस धोरण आखावे आणि हर्बल हुक्काच्या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारला आता निर्णायक पावले उचलावी लागणार आहेत, हे नक्कीच.
सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. हा विषय केवळ आरोग्याशी संबंधित नाही, तर सामाजिक संतुलन बिघडवणारा आहे. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर निर्णायक तोडगा काढण्याची गरज आहे, आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हा लढा भविष्यात समाजाच्या हितासाठी एक मोठा परिवर्तनाचा टप्पा ठरेल.
Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला