
25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचे गळचेपी केली होती. या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहे.
25 जून 1975 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात कोरला गेलेला काळा दिवस. देशाने ज्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे लढा दिला, त्या लोकशाहीच्या मुळावर घाव बसला होता. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाच्या कलम 352 अंतर्गत संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय आणीबाणी’ लागू केली होती. तब्बल 21 महिन्यांपर्यंत भारताची लोकशाही गळा दाटून बसली होती. या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीवर गैरव्यवहार केल्याचा शिक्का मारला होता. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर गंडांतर आले होते. विरोधकांचा दबाव वाढू लागला.
जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘समग्र क्रांती’चं वादळ देशभर उसळत होतं. अशा परिस्थितीत अंतर्गत सुरक्षेचा धोक्याचा सांगावा देत इंदिरा गांधींनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून आपत्कालीन अधिकार घेतले आणि भारतीय संविधानावरच गदा आणली. आणीबाणीच्या घोषणेनंतर देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टाच आणली गेली. वृत्तपत्रांवर गंडांतर, संपादकांच्या हातात केवळ काळे डॉट उरले. आंदोलनकर्त्यांना रातोरात तुरुंगात डांबले गेले. व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य आणि विचार मांडण्याचा हक्क पायदळी तुडवला गेला.

हुकूमशाहीचा जिवंत चेहरा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच देश स्वतःच्या लोकांनीच लादलेल्या भयाच्या छायेत अडकला होता. जणू देश पुन्हा पारतंत्र्यात गेला होता. तेव्हा हुकूमशाहीचा चेहरा देशवासीयांनी प्रत्यक्ष अनुभवला. 25 जून 2025 रोजी या काळरात्रीला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा खासदार सुनील मेंढे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने देशावर ही काळरात्र लादली. इंदिरा गांधींची आणीबाणी ही काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचं जिवंत उदाहरण आहे, असा घणाघात त्यांनी केला.
सुनील मेंढे म्हणाले, 21 महिन्यांची ती काळरात्र म्हणजे भारतीय लोकशाहीच्या हत्या आणि संविधानाच्या अपमानाचा काळ होता. या काळात सामान्य नागरिकांवर, पत्रकारांवर आणि विरोधकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले. 25 जून रोजी संपूर्ण देशभर ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्यात येतोय. या निमित्ताने लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि त्या काळातील काळे अध्याय लक्षात ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत.आणीबाणीचा हा काळकुट इतिहास पुढील पिढ्यांना सतत आठवत राहिला पाहिजे, असा सूर आता उमटत आहे.
Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज
लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणे आणि संविधानाचं संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं जातंय. स्वातंत्र्य हे कोणाची देणं नसून, ते लोकांनी मिळवलेले आणि जपलेले असते. त्यामुळे कोणत्याही सत्तेच्या लालसेपुढे लोकशाही झुकू नये, असा संदेश देत सुनील मेंढेंनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.