
माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पूर्व विदर्भातील तीव्र उष्णता आणि थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.
भंडारा-गोंदियासह संपूर्ण पूर्व विदर्भात उन्हाळ्यात तापमानाने ४७ अंश सेल्सिअसचा आकडा पार करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. हिवाळ्यातही नऊ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. अशा प्रतिकूल हवामानातही शेतकरी, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक रोजंदारीसाठी उघड्यावर काम करत असतात. मात्र, तापमानाच्या या टोकाच्या झळा त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरत आहेत. ही बाबा लक्षात घेता भंडारा-गोंदियाचे लोकसभा सदस्य माजी खासदार सुनील मेंढे यांनी यावर पुढाकार घेतला आहे.
उष्माघात आणि हायपोथर्मिया (म्हणजे शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत कमी होणे) मुळे दरवर्षी अनेकांचे प्राण जात आहेत. दुर्दैवाने, अशा दुर्दैवी मृत्यूंना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कोणताही मदतीचा हात दिला जात नाही. गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार सुनिल मेंढे यांनी केंद्र आणि राज्य शासनाला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी उष्माघात आणि अति थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश अधिकृत आपत्तींत करावा, अशी मागणी केली आहे.

आर्थिक मदतीचा दिलासा
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळते, मात्र उष्णतेमुळे होणारे उष्माघात किंवा थंडीमुळे होणारा हायपोथर्मिया यात समाविष्ट नाही. परिणामी, मृतकांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. सुनिल मेंढे यांनी केंद्र स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पात्र पावले आहे. सोबतच त्यांनी राज्यपातळीवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना पत्र पाठवत हा गंभीर विषय मांडला आहे.
Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला
पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, अत्यंत उष्णता आणि तीव्र थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंनाही नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता द्यावी. त्यामुळे अशा परिस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदतीचा दिलासा मिळेल. विशेषतः भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. येथे उन्हाळ्यात तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचते, तर हिवाळ्यात नऊ अंशांपर्यंत घसरते. अशा वेळेस गरिब, शेतकरी आणि श्रमिकांसाठी हे हवामान प्राणघातक ठरत आहे.
निर्णय घेण्याची मागणी
दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघात आणि हिवाळ्यात अति थंडीने अनेक नागरिकांचा बळी जातो. मात्र, ही आपत्ती शासनाच्या अधिकृत यादीत नसल्याने, त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते. सुनिल मेंढे यांनी यासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि या नैसर्गिक संकटांना अधिकृत आपत्तीचा दर्जा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
सरकारने जर ही मागणी मान्य केली, तर उष्णता आणि थंडीमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना आर्थिक मदत मिळाल्यास त्यांचे जीवन सावरण्यास मदत होईल. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.