प्रशासन

Tadoba Tiger Reserve : मचाण उपक्रमाच्या सावलीत जनजागृती हरवली

Machan Upakram : वन्यजीवांशी मैत्रीच्या वाटेवर शुल्काचा अडथळा

Author

जंगल आणि वन्यजीवांशी नाते जोडणाऱ्या मचाण उपक्रमाने आता आपली दिशा हरवली आहे. जनजागृतीच्या पवित्र हेतूवर भर द्यायचा सोडून शुल्कवाढीचा भार टाकला जात आहे.

जंगल आणि वन्यजीवांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वन विभाग दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मचाण उपक्रम राबवतो. चंद्रप्रकाशात मचाणावर बसून प्राण्यांचे निरीक्षण करण्याची ही संधी नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या उपक्रमाच्या शुल्कात मोठी वाढ झाल्याने मूळ उद्देश बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे.

पूर्वी वन्यजीव गणनेसाठी वापरण्यात आलेली ही पद्धत कालांतराने जनजागृतीचा उपक्रम म्हणून पुढे आणली गेली. परंतु आता या उपक्रमाने व्यावसायिक वळण घेतले आहे. नागरिकांना जंगलाशी जोडण्याचा हेतू विसरून केवळ महसूल मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना नोंदवली जात आहे.

Sunil Mendhe : माजी खासदार साहेब; तुम्हीही लागले या नादाला?

ताडोबात सर्वाधिक शुल्क

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मचाण उपक्रमासाठी सर्वाधिक साडेचार हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. यामध्ये नोंदणीसाठी दीड हजार रुपये, जिप्सी शुल्क दोन हजार रुपये आणि प्रवेशद्वार ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क म्हणून एक हजार रुपये रोख स्वरूपात वसूल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या शुल्कात भोजन व पाण्याचा कोणताही समावेश नाही. सहभागी पर्यटकांना स्वतःची भोजन व्यवस्था करावी लागते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात याच उपक्रमासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारले जात असले तरी, येथे सहभागींना व्याघ्र प्रकल्प प्रशासनामार्फत भोजन, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था पुरवली जाते. तसेच, सह्याद्री व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांमध्ये केवळ दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. या शुल्कात सर्व आवश्यक सोयी समाविष्ट आहेत.

Padma Award : देशभरातील कर्तृत्वाला पद्म पुरस्कारांचा मान

संधी देण्याची गरज

निसर्गानुभव उपक्रमाचा मुख्य हेतू नागरिकांमध्ये जंगल आणि वन्यजीवांविषयी प्रेम आणि जाणीव निर्माण करणे हा होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत गावकरी आणि स्थानिक युवकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यावर भर दिला जात नाही. जर स्थानिक विद्यार्थ्यांना व युवकांना यामध्ये सहभागी करून घेतले गेले, तर मानव-वन्यजीव संघर्षाच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. गावकऱ्यांचे वन्यजीव विभागावर अधिक विश्वास बसेल.

गावकऱ्यांच्या सहभागामुळे या प्रकारच्या उपक्रमात जंगल रक्षणाचे कार्यही प्रभावीपणे राबवता येईल. स्थानिकांना जंगलातील विविध पैलू समजावून सांगितल्यास, ते स्वतः जंगलाचे रक्षक बनू शकतील. त्यामुळे उपक्रमाचा मूळ उद्देश पुन्हा साध्य करणे शक्य होईल.

Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर

निसर्गानुभव किंवा मचाण उपक्रमाचा पाया जनजागृती हा आहे. त्यामुळे सहभागींना भोजन व पाण्याची स्वतंत्र सोय करायला लावण्याऐवजी, ही जबाबदारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानेच घ्यावी. सुरुवातीच्या काळात प्रशासनाकडूनच भोजन व पाण्याची उत्तम सोय केली जात होती. त्यामुळे शुल्कात अनावश्यक वाढ न करता, सहभागी नागरिकांना सुलभ आणि सकारात्मक अनुभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!