
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना बोलण्यास मनाई केली आहे.
राजकारणाच्या रणधुमाळीत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली बाब म्हणजे ठाकरे बंधू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं. राज ठाकरेंनी एकत्र येण्याची खुलेआम तयारी दर्शवली आणि उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र या संभाव्य युतीवर सध्या राजकीय रणसंग्राम पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरे सध्या परदेशात असताना देखील त्यांनी पक्षशिस्त आणि नियोजन याला प्राधान्य दिलं आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी 29 एप्रिलपर्यंत ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीबाबत कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, अशा स्पष्ट सूचना पक्षातील सर्व नेत्यांना दिल्या आहेत. ही बाब संवेदनशील असून चर्चांना उधाण नको, हे ठाकरे यांचं स्पष्ट मत आहे.

Amol Mitkari : पवारांची एकता म्हणजे राष्ट्रवादीसाठी नवी पहाट
नाराजीच्या वाऱ्यांना बळ
मनसेतील काही नेते संभाव्य युतीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करताना दिसले आहेत. संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांचे वक्तव्यामुळे ही नाराजी अधिक स्पष्ट झाली आहे. अशा अभद्र युतीपासून ईश्वर वाचवो, अशा शब्दांत अमेय खोपकरांनी आपली भूमिका अधोरेखित केली आहे. संदीप देशपांडे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करत मनसैनिकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची आठवण करून दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी देखील या संभाव्य युतीबाबत आपल्या अटी मांडल्या आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणीही येणार असेल, तर त्याच्याशी मैत्री शक्य नाही, अशा स्वरूपाचं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. हे वक्तव्य थेट राज ठाकरेंना उद्देशून दिलं गेलं असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांमध्ये नव्या अटी-शर्थींचा शिरकाव झाला आहे.
प्रयत्नात पूर्वस्मृतींची सावली
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचं वळण आहे.तरीही मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही जुन्या घटनांची ठसठस आहे. विशेषतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात अजूनही कटुता कायम आहे.
सद्यस्थितीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे प्रयत्न एका नव्या वळणावर आहेत. पण हे प्रयत्न केवळ भावनिक नाहीत, तर त्यांच्या मागे भूतकाळ, कार्यकर्त्यांची भावना आणि पक्षातील अंतर्गत समीकरणंही आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांमुळे पक्षातील शिस्त अबाधित राहील, मात्र अंतर्गत मतभेद मात्र पुन्हा समोर येत आहेत.
सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा धगधगत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे राजकीय वर्तुळात सध्या हलकल्लोळ माजला आहे. राजकारणातील या नाट्यमय वळणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.