
गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यात अवैध वाळू तस्करीवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत 1 कोटी 45 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करत चार जणांना अटक करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करीविरोधात अखेर पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलले आहे. 10 जूनच्या मध्यरात्री पोलिसांनी देऊळगाव आणि डोंगरसावंगी या दोन वाळूघाटांवर धडक कारवाई करत एकूण 1 कोटी 45 लाख 74 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून, प्रमुख सूत्रधार शुभम निंबेकर अद्याप फरार आहे.
कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र महसूल विभाग या संपूर्ण प्रकारात निष्क्रिय ठरला. तसेच पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. दोन वर्षांपासून चालू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई करण्याऐवजी महसूल प्रशासन शांत राहिल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

सुसज्ज मशीनद्वारे उपसा
आरमोरी पोलिसांना देऊळगाव आणि डोंगरसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री मोठा सर्जिकल स्ट्राईक केला. डोंगरसावंगी घाटावर पोलिसांनी छापा टाकत तेथून 60 लाख रुपये किमतीची पोकलेन मशीन आणि 25 लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. ट्रकमध्ये 10 ब्रास रेती होती. ज्याची किंमत 6 हजार 750 रुपये इतकी होती. घटनास्थळी मिळून आलेला एकूण मुद्देमाल 85 लाख 6 हजार 750 रुपये इतका झाला. यावेळी ऋषी सितकुरा राऊत, विकेशकुमार चंद्रसिंग आणि रुपेश अजित शेख या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्याचवेळी, देऊळगाव येथील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या दुसऱ्या घाटावरही पोलिसांनी जोरदार धडक दिली. येथेही पोकलेन मशीनद्वारे वाळू उपसा चालू होता. पोलिसांनी येथून 60 लाख रुपये किमतीची पोकलेन मशीन आणि 100 ब्रास रेती जप्त केली. रेतीची किंमत सुमारे 67 हजार 500 रुपये इतकी होती. अशा प्रकारे एकूण 60 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मोहम्मद तौकिर अब्दूल हसन याला या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
दोन्ही वाळूघाटांचा मालक शुभम अरुण निंबेकर असल्याचे निष्पन्न झाले. तो या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या कारवाईदरम्यान एका मोठ्या राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत असून, या वाळू तस्करीत काही राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अवैध वाळू उपसाची सुरुवात शेती घाटाच्या नावावर झालेली असून, प्रत्यक्षात नदीपात्रात मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने वाळू काढली जात आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड वर्षांपूर्वी एलसीबीनेही अशाच प्रकारे मोठी कारवाई केली होती. पण महसूल विभाग मात्र गप्प राहिला होता. याहीवेळी महसूल प्रशासनाने घाट चालकांवर कोणताही दंड ठोठावलेला नाही.