
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांचे दर्शन आता नागपुरात होणार आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे अखेर महाराष्ट्राच्या भूमीत परत आली आहेत. हे ऐतिहासिक कार्य घडवून आणण्याचे श्रेय जाते महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना. ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे अनमोल ऐतिहासिक शस्त्र पुन्हा एकदा आपल्या मातीत आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या ऐतिहासिक घटनेचे जल्लोषात स्वागत झाले. शिवभक्तांच्या हृदयात आनंद आणि अभिमानाचे भरते आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशी संबंधित वाघनखं मागील अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या विक्टोरिया संग्रहालयात होती. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे वाघनखे परत महाराष्ट्रात आली. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनख ठेवण्यात आली होती. ही वाघनखं आता नागपूरमध्ये येणार आहेत. ज्यामुळे विदर्भातील जनतेला आता वाघनखांचे दर्शन होणार आहे. नागपुरात वाघनखांचे आगमन हे केवळ ऐतिहासिक क्षण नसून, संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाचा दिवस ठरणार आहे. या ऐतिहासिक वारसाचा जागर करण्यासाठी नागपूरमध्ये भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि नागरीक मोठ्या संख्येने या सोहळ्यास हजर राहणार आहेत.

नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा
इतिहासाचे खरे रक्षक
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि शौर्य आजही लाखो शिवभक्तांच्या हृदयात ऊर्जा निर्माण करतात. शिवरायांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे केवळ एक शस्त्र नव्हते, तर ती स्वराज्यसंघर्षाचा एक अमूल्य ठेवा आहे. दुर्दैवाने, ही ऐतिहासिक वाघनखे अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात होती. परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी या ऐतिहासिक वारशाच्या पुनर्वसनासाठी अत्यंत धडाडीने पाऊले उचलली.
या ऐतिहासिक वारसाला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्लंड सरकार आणि संग्रहालय प्रशासनाशी थेट संवाद साधला. अनेक कायदेशीर अडचणी आणि परदेशी नियमांच्या चौकटीत राहून त्यांनी अत्यंत कौशल्याने हा मुद्दा मांडला. त्यांची चिकाटी, दृढनिश्चय आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी असलेली तळमळ यामुळेच आज हे ऐतिहासिक शस्त्र पुन्हा आपल्या भूमीत परत आले आहे.
महाराष्ट्रभर आनंदोत्सव
वाघनखांच्या आगमनानिमित्त संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिवप्रेमींना एक अनमोल भेट मिळाली आहे. हा फक्त एक ऐतिहासिक ठेवा नाही, तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची, त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाची आणि त्यांच्या असामान्य शौर्याची आठवण आहे.
अनेक ठिकाणी शिवभक्तांनी जल्लोष साजरा केला. भगवे ध्वज फडकवले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी घोषणा दिल्या. नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबईसह राज्यभर विविध ठिकाणी वाघनखांचे स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, ज्याची वाट अनेक वर्षांपासून पाहिली जात होती.
मुनगंटीवारांचा दृढ संकल्प
सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, विचारधारा आणि त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य सातत्याने सुरू आहे.
यापूर्वीही त्यांनी राज्याच्या ऐतिहासिक स्थळांचे पुनरुज्जीवन, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. शिवरायांचे वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्याच्या ऐतिहासिक कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार यांचे अभूतपूर्व कौतुक केले जात आहे. इतिहासप्रेमी, शिवभक्त, अभ्यासक, राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनता त्यांचे आभार मानत आहे. सोशल मीडियावरही ‘धन्यवाद सुधीर मुनगंटीवार’ असा ट्रेंड पाहायला मिळाला.
नव्या पिढीला प्रेरणा
या ऐतिहासिक घटनेमुळे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नव्याने ओळख होईल. या वाघनखांच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याची, स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची आणि त्यांच्या ध्येयधोरणांची प्रेरणा तरुण पिढीला मिळणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात नवा सोनेरी अध्याय जोडला गेला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेल्या नेतृत्वगुणांमुळे हा ऐतिहासिक क्षण साकार झाला आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे आभार मानले जात आहे.