
वाहनचालकांच्या त्रासाला पूर्णविराम देणारी यंत्रणा लवकरच देशात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पारंपरिक टोल वसुली पद्धतीला बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे.
देशाच्या रस्ते विकासाचे शिल्पकार समजले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांच्या दीर्घकाळाच्या तक्रारींना पूर्णविराम देणारी आणि टोल वसुलीची नवी दिशा दाखवणारी घोषणा गडकरींनी केली आहे. देशभरातील टोलनाके बंद करून, एक प्रगत आणि आधुनिक सॅटेलाईट बेस्ड टोलिंग सिस्टिम लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, देशभरातील टोलनाक्यांवर गाड्यांच्या रांगा कमी करण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना राबवल्या. फास्ट टॅग सक्तीने लागू केल्यावर काही प्रमाणात फायदा झाला. पण तरीही काही अडचणी कायम आहेत. त्यामुळे आम्ही आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. लवकरच संपूर्ण देशात टोलनाके पूर्णतः बंद होतील.

नवीन पॉलिसी
केंद्रीय मंत्री गडकरी पुढे सांगतात, आपण सॅटेलाईट बेस्ड फ्री टोलिंग सिस्टिम तयार करत आहोत. ही प्रणाली पूर्णपणे कॅमेऱ्यावर आधारित असेल. वाहनांच्या नंबर प्लेट्सवरून टोल ओळखला जाईल आणि वाहन चालक जिथून प्रवास सुरू करेल तेथून जिथे प्रवास संपेल, त्या अंतराचाच टोल थेट त्यांच्या बँक खात्यातून वसूल केला जाईल. यामुळे कुठेही थांबण्याची गरज भासणार नाही, आणि टोल वसुलीमध्येही पारदर्शकता येईल. गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, पंधरा दिवसांत अशी पॉलिसी लागू होईल. ज्यानंतर नागरिकांची टोलबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. मी महाराष्ट्रातील टोलनाक्यांविषयी बोलत नाही, पण राष्ट्रीय महामार्गांवरील अडचणी निश्चितपणे सुटणार आहेत.
जूनपर्यंत पूर्णत्वास
गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीबाबतही दिलासा दिला. ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून अडथळ्यांमुळे रखडले होते. कोर्ट केसेस, शेतीच्या जमिनीसंबंधी वाद, आर्थिक मोबदल्याचे प्रश्न, अशी अनेक आव्हाने होती. कोकणातील वास्तव सांगितलं तर लोकांना पटणार नाही, पण आम्ही सगळ्या अडचणींवर मात केली आहे. यंदाच्या जूनपर्यंत हा महामार्ग शंभर टक्के पूर्ण होईल. त्यांनी दिलखुलासपणे कबुली दिली की, दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा हे आमच्या मंत्रालयातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. मात्र आता आम्ही त्या देखील दूर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत.
नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकासाला मिळालेली गती ही अभूतपूर्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर करणे, वेळ आणि इंधनाची बचत करणे, आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणे या सर्व बाबी केंद्रस्थानी ठेवून ते काम करत आहेत. सॅटेलाईट टोलिंग प्रणाली हा देशाच्या प्रगतीचा आणखी एक पायरी ठरणार आहे. भविष्यातील भारतात कुठेही थांबण्याची गरज नसेल, ट्रॅफिकमुळे वेळ वाया जाणार नाही आणि प्रत्येक प्रवासीाला अचूक व न्याय्य टोल आकारला जाईल. हे चित्र आता खूप लांब नसून अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलं आहे.