
मार्च महिन्यात नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीत पोलिसांची वेगळीच करामत समोर आली आहे.
शांततेचा चेहरा म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर 17 मार्चच्या रात्री अचानकच जळून निघालं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गटांत तणाव उसळला आणि मग काय शहरात दगडफेक, वाहनांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि थेट पोलिसांवर हल्ले झाले. या हिंसाचाराने नागपूरची शांतता ढवळून निघाली आणि राष्ट्रीय पातळीवर या घटनेची दखल घेतली गेली. या हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुमारे २०० हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले.
मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष फहीम खान, हमीद इंजिनिअर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान हे प्रमुख आरोपी ठरले. या हिंसाचारात इरफान अन्सारी नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला आणि प्रकरण आणखीनच संवेदनशील बनले होते. या प्रकरणातील सगळ्यात चर्चेचा भाग ठरला तो सद्दाम अन्सारी नावाच्या व्यक्तीचा. व्यवसायाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालक असलेल्या सद्दाम यांना पोलिसांनी रस्त्यावर वृक्षतोड करताना अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यावर थेट दंगल घडवणाऱ्या आरोपींच्या यादीत समावेश करून हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Devendra Fadnavis : पीएम आवास योजनेचे मिशन महाराष्ट्रात यशाच्या शिखरावर
सामाजिक सलोख्यावर प्रश्न
हसनबाग परिसरातील रहिवासी असलेल्या सद्दाम अन्सारी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांचे वकील म्हणाले, माझा क्लायंट दंगलग्रस्त भागात नव्हताच. तो त्याच्या दुकानाजवळ झाडं कापत होता आणि हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्धही होतं. सुनावणीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. पवार यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. सद्दाम अन्सारी दंगलमध्ये सहभागी नव्हते, आणि केवळ त्याच दिवशी रस्त्यावरील वृक्ष कापत होते. त्यांच्या कृत्याचा हिंसाचाराशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे त्यांना काही अटींसह जामिनावर सोडण्यात आलं. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांची कारवाई आणि त्यामागचं राजकीय व जातीय समीकरणही चर्चेत आलं आहे.
स्थानिक नागरिक आणि नेतेमंडळींनी पोलिसांकडून तथ्यांची योग्य पडताळणी न करता केलेली ही कारवाई म्हणजे निष्पाप व्यक्तींना गोवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. हिंसाचारानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. या घटनेमुळे नागपूरच्या सामाजिक सलोख्यावर आणि पोलिसांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. एकीकडे दोषींवर कठोर कारवाई आवश्यक आहे, तर दुसरीकडे निष्पाप नागरिकांवर अन्याय होऊ नये याचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.