देश

Amit Shah : शिवरायांचा जो करेल अपमान, त्याला व्हावे कठोर संधान 

Udayanraje Bhosale : जाणता राजाच्या सन्मानासाठी उदयनराजे पोहोचले दिल्लीत 

Author

खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विशेष कायदा करण्याची मागणी केली. दिल्लीमध्ये शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचीही त्यांनी विनंती केली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी 27 मार्च गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी विशेष कायदा लागू करण्याचे निवेदन दिले.

उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून या महत्वपूर्ण भेटीची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही विकृत विचारसरणीच्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अपमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे.

Bhaskar Jadhav : जॅकेटच्या राजकारणाचा अर्धविराम

लगाम घालावा 

गृहमंत्री अमित शाह यांना दिलेल्या निवेदनात उदयनराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने एक विशेष कायदा संमत करावा, अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आणि इतिहास यांची योग्यरित्या रक्षा करायची असेल, तर अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी कठोर कायदा हवा. हा कायदा मकोका (MCOCA) किंवा टाडा (TADA) प्रमाणे अजामिनपात्र असावा. दोषींना किमान 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच जबरदस्त दंडाची तरतूद असावी.

इतिहासाच्या विकृतीकरणाला रोखण्यासाठी आणि कोणालाही स्वैर विधान करण्यास प्रवृत्त होऊ नये. यासाठी राज्यशासनाने योग्य त्या इतिहासकार आणि तज्ज्ञांशी चर्चा करून अधिकृत इतिहास प्रसारित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. सध्याच्या काळात काही जण आपल्या सोयीनुसार इतिहासाचा विपर्यास करून वाद निर्माण करतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे उदयनराजे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित 

स्मारक उभारण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे कार्य, विचारधारा आणि पराक्रम यांचा जागतिक पातळीवर सन्मान राखण्यात यावा. यासाठी नवी दिल्ली येथे महाराजांचे एक भव्य राष्ट्रीय स्मारक उभारले जावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी उदयनराजेंनी केली. या स्मारकामध्ये ऐतिहासिक दस्तावेज, दुर्मिळ चित्रे, छत्रपतींनी वापरलेली शस्त्रे, युद्धनीतीचे दस्तऐवज आणि अन्य ऐतिहासिक साधने प्रदर्शित करण्यात यावीत. या माध्यमातून जागतिक संशोधक आणि अभ्यासकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अभ्यास करता येईल. पर्यटकांसाठीही हे एक प्रमुख आकर्षण ठरेल, असे उदयनराजे यांनी नमूद केले.

किल्ल्यांचे संवर्धन 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी निगडीत गडकिल्ले ही महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहेत. अनेक किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे. यासाठी सरकारने एक व्यापक धोरण आखून किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. उदयनराजे भोसले यांनी ‘शिवस्वराज्य सर्किट’ तयार करण्याची कल्पना मांडली. याअंतर्गत मराठा साम्राज्याशी संबंधित प्रमुख किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यात यावा.

Sudhir Mungantiwar : ‛रयतेचं राज्य’ हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द

मांडलेल्या कल्पनेच्या पहिल्या टप्प्यात राजगड, रायगड आणि अजिंक्यतारा या राजधानी किल्ल्यांचा विशेष विकास करावा. तर दुसऱ्या टप्प्यात जिंजी (कर्नाटक), पानीपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर यासारख्या ऐतिहासिक स्थळांचा विकास केला जावा. यामुळे केवळ गडकिल्ल्यांचे संरक्षण होणार नाही, तर भविष्यातील पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव करून देण्यास मदत होईल.

ठाम भूमिका

शिवाजी महाराज यांचे नाव घेताना अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने त्यांचा खरा इतिहास जपला पाहिजे. त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांना त्यांच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे, असे उदयनराजे यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच देशभरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुयायी आणि शिवप्रेमींनी यासाठी एकत्र येऊन या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

अमित शाह यांना दिलेल्या या निवेदनातून उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींच्या बदनामीसाठी कोणत्याही प्रकारचे उथळ वर्तन सहन केले जाणार नाही, हे स्पष्ट केले. जो कोणी शिवरायांचा अपमान करेल, त्याच्यावर कडक कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देत शिवरायांच्या नावाचा आदर ठेवणाऱ्या प्रत्येकाने हा लढा पुढे न्यायला हवा, असे त्यांनी म्हटले.

गृहमंत्र्यांशी या भेटीमुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उदयनराजे भोसले यांच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी शिवप्रेमींची अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!