
खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात भारत-पाकिस्तान तणावावर आपले विचार मांडले, फाळणीच्या वेदना आणि शहीद जवानांच्या बलिदानावर दुःख व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरमध्ये बोलताना भारत-पाकिस्तान तणाव, सीमेवरील शहिद जवान, आणि सामाजिक सलोख्यावर आपली ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणात राष्ट्राच्या भविष्यावर, युद्धाच्या परिणामांवर आणि मानवी भावनांवर चिंतन करण्याचा संदेश होता.
उदयनराजेंच्या भावनिक भाषणाने उपस्थितांमध्ये गंभीर विचारांना चालना दिली. त्यांनी फाळणीच्या इतिहासाबाबत विचार मांडले. त्यानंतर झालेल्या सामाजिक-राजकीय घडामोडींचा गांभीर्याने आढावा घेतला. त्यांचे विचार युद्धाच्या राजकारणावर नव्हे तर मानवतेच्या मूल्यांवर केंद्रित होते.

सीमेवरील जवानांचे बलिदान
उदयनराजे म्हणाले की, आजही सीमेवर जवान शहीद होत आहेत. हे अत्यंत वेदनादायक आहे. युद्धाच्या नावाखाली सामान्य माणसांचे प्राण जात आहेत. अनेक कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. हे पाहून कोणालाही मानसिक त्रास होऊ शकतो. ही गोष्ट आपण सर्वांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सीमेवरील मृत्यूंचा विचार करताना त्यांनी सांगितले की, बॉर्डरवर जर आपलाच कोणी असेल आणि त्याला काही झाले, तर काय वाटेल? अशी भावना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन अनुभवायला हवी. युद्धाच्या राजकारणापेक्षा मानवी मूल्ये मोठी आहेत. ती जपण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
फाळणीच्या घटनेबाबत उदयनराजेंनी सांगितले की, त्या काळात कोणत्या आधारावर ही फाळणी झाली, हे कळत नाही. कोणत्याही एका बाजूचा दोष न काढता त्यांनी सांगितले की, त्या काळच्या नातेवाईकांबद्दल, फाळणीच्या निर्णयांबद्दल संशोधन होणे आवश्यक आहे. त्यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दलही तीव्र भावना व्यक्त केली.हिंदू-मुस्लिम सलोखा, समाजातील बंधुभाव आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करणं ही काळाची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. कोणत्याही संकटाच्या वेळी माणसाचा धर्म नाही, तर त्याची रक्तगट पाहिला जातो, असा विचार त्यांनी मांडला आणि सामाजिक सलोख्याचा महत्त्व पटवून दिलं.
Vijay Wadettiwar : घड्याळाचे काटे जुळले तरी काँग्रेसला फरक पडत नाही
दहशतवादाचा उगम
उदयनराजे यांनी दहशतवादाच्या जन्माविषयी भाष्य करताना स्पष्ट सांगितले की, अशा प्रवृत्ती कशा तयार होतात, याचा विचार समाजाने करणे गरजेचे आहे. उपाशी पोटी राहणाऱ्या, बेरोजगारीने ग्रासलेल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी असलेल्या व्यक्तींचे दहशतवादी बनणे ही सामाजिक अपयशाची प्रतिक्रिया आहे, असे ते म्हणाले. सामाजिक असमानता, उपेक्षा आणि विषमता दूर करणे ही दहशतवाद थांबविण्याची खरी दिशा असल्याचा संदेश त्यांनी दिला. हा विषय केवळ सुरक्षा यंत्रणांपुरता मर्यादित न राहता तो सामाजिक सुधारणा आणि कल्याणासाठीही महत्त्वाचा आहे, असे त्यांचे मत होते.
भौगोलिक सीमारेषा मानवनिर्मित असल्या तरी निसर्ग सर्वांचा आहे, असे उदयनराजे यांनी ठामपणे सांगितले. पर्वतरांगा, नद्या, निसर्गसंपदा या कोणत्याही राष्ट्राच्या मालकीच्या नाहीत. त्यामुळे या सीमांच्या नावाखाली युद्धे लादणे हे निसर्गाच्या आणि मानवतेच्या विरोधात आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. मानवाने स्वतः निर्माण केलेल्या सीमारेषा आणि स्वार्थामुळे जगात तणाव, संघर्ष आणि शत्रुत्व वाढत आहे. यावर आत्मचिंतन करणे आणि जागतिक स्तरावर शांतीचा मार्ग स्वीकारणे हेच खरे राष्ट्रहित असल्याचा संदेश त्यांनी दिला.