महाराष्ट्र

Uddhav Thackeray : वर्षभर शिमगा, निवडणुकीत पुरणपोळी

Shiv Sena UBT : सणानुसार राजकारण करणाऱ्या भाजपची पोलखोल

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून निवडणुकीत राजकीय फायदा घेतल्याचा आरोप केला.

संपूर्ण देशभरात ईदचा जल्लोष सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौगात-ए-मोदी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाद्वारे मुस्लिम कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात मात्र याच्या विरुद्ध एक वेगळेच राजकीय वादंग पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीपासून सुरु झालेला हिंदू-मुस्लिम तणाव आणि नागपुरातील दंगलींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ‘सौगात-ए-मोदी’ हा कार्यक्रम आता नव्या वादात अडकला आहे.

मोदींच्या या उपक्रमावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपवर थेट आरोप करताना म्हटले की, ‘हिंदूंना दंगलींसाठी वापरणारे आता सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमांच्या गळ्यात गळे घालत आहेत. हिच तर खरी ‘सौगात-ए-सत्ता’ आहे. त्यांनी भाजपला प्रश्न विचारला की, ‘आम्ही हिंदुत्व सोडले, असे म्हणणारे त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढणार का?’

Shambhuraj Desai : टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ

मोदींचा सत्ता जिहाद

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला मुस्लिमांनी मतदान केल्यावर आम्हाला हिंदुत्व सोडल्याचे ठरवले गेले. आता भाजपने 32 ते 35 लाख मुस्लिम कुटुंबीयांना भेटवस्तू वाटण्याचा कार्यक्रम घेतला आहे, तर हे काय ‘सत्ता जिहाद’ नाही का? असा थेट सवाल त्यांनी केला. भाजपच्या पूर्वीच्या वक्तव्यांचीही त्यांनी आठवण करून दिली. ‘महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे आता ‘सौगात’ वाटायला निघाले आहेत.

वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने ‘शिमगा’ करायचा, आणि निवडणूकीला ‘पुरणपोळी’ द्यायची? असेही ठाकरेंनी म्हटलं. ठाकरेंनी भाजपच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधताना आणखी एक मुद्दा उपस्थित केला. ‘ईदला सौगात वाटली जाते, ठीक आहे. पण हनुमान जयंती आणि रामनवमीला काही वाटणार आहे का? भाजपकडे अल्पसंख्याक सेल आहे, तसा बहुसंख्यांक सेल आहे का?’ असा टोला त्यांनी लगावला.

Nitin Gadkari : विकास पुरुषाकडून राज्याच्या महामार्ग जाळ्यात मोठी भर

कोर्टाचा निर्णय

भाजपकडून हिंदूंना केवळ घंटा वाजवायला दिली जाते, त्यांना दंगलींसाठी वापरले जाते आणि जेव्हा हिंसाचार होतो, तेव्हा त्यांच्यावरच पोलिस कारवाई होते. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. दिल्लीच्या निवडणुकीनंतर भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराने इफ्तार पार्टी दिली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘भाजप स्पष्टपणे सांगणार आहे का की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे? का आम्ही जेव्हा मुस्लिम मतं मिळवतो, तेव्हा तो ‘सत्ता जिहाद’ आणि भाजप मुस्लिमांसोबत जातो तेव्हा तो ‘सर्वसमावेशक’? अशा शब्दांत त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. शेवटी, उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की, लवकरात लवकर निकाल द्यावा. ‘सत्ता टिकवण्यासाठी पक्षांतर करणाऱ्यांचे मंदिर बांधले जात आहे. पण सुप्रीम कोर्टाने सत्याच्या आधारावर निर्णय दिला पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ हे तत्त्व पाळले जावे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Ramtek : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अवैध मुरुम उत्खननाला ऊत

‘सौगात-ए-मोदी’ या कार्यक्रमामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी निवडणुकांमध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण अजून किती पेटणार? उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका आणि भाजपची रणनीती यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!