
दुधराम सव्वालाखे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ईडीच्या कारवाईपासून बचाव करत त्यांनी आपले राजकीय भवितव्य सुरक्षित केले आहे.
राजकारणातील पक्षांतरांचे वादळ आता आणखी जोर धरू लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या आणखी एका अत्यंत विश्वासू सहकाऱ्याने त्यांना सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामटेक तालुक्यातील नगरधन सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कमळहस्ते पक्षप्रवेश केला.
भाजपकडून सव्वालाखे यांचे स्वागत झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सुनील केदार यांच्या आसपासच्या मंडळींना भाजपने आपल्याकडे वळविण्याची ही सलग चौथी मोठी खेळी ठरली आहे.

केदारांच्या गटात खळबळ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदारांचे निकटवर्तीय समीर उमप, उज्ज्वला बोढारे, मनोहर कुंभारे यांच्यानंतर आता सव्वालाखे यांचा भाजप प्रवेश हा केदारांच्या नेतृत्वावर थेट घाव मानला जात आहे. काँग्रेसमध्ये राजकीय आश्वासने आणि महाविकास आघाडीतील समीकरणांनी सव्वालाखे यांना काही लाभ मिळाला नाही. परिणामी, त्यांनी भाजपचा हात पकडून आपले राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सव्वालाखे यांचा राजकीय प्रवास केवळ पाच वर्षांचा असला तरी त्यांनी अल्पावधीत प्रभावी ओळख निर्माण केली. उपनिबंधक पदावर कार्यरत असताना त्यांनी राजकारणात उडी घेतली. मात्र त्यावेळेस त्यांच्या दोनशे कोटींच्या मालमत्तेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये झपाट्याने महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले.
महत्त्वाकांक्षांचे ओझे
महाविकास आघाडीच्या काळात आणि सुनील केदार मंत्री असताना सव्वालाखे यांना जिल्हा परिषदेत सभापती पदाची अपेक्षा होती. शिवाय, काँग्रेस गटनेतेपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. पण ही पदे न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी वाढली. त्यातच रामटेक विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा उफाळून आली होती.
मात्र, काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. राजेंद्र मुळक यांनी उमेदवारी जाहीर करताच, केदारांचे पूर्ण समर्थन त्यांना मिळाल्याने सव्वालाखे यांना बाजूला व्हावे लागले. त्यामुळे पक्ष बदलण्याची तयारी त्यांनी आधीच सुरू केली होती.
सुरक्षिततेचा राजकीय डाव
सव्वालाखे यांच्या नावावर भूखंड व्यवहारांतील गैरव्यवहारांच्या तक्रारी आधीपासूनच नोंद झाल्या होत्या. नोकरीत असताना त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्या दोनशे कोटींच्या संपत्तीची माहिती उघड झाल्यानंतर ईडीकडूनही त्यांना नोटीस मिळाली होती. अशा वेळी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपल्या सुरक्षेचा राजकीय कवच मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने सव्वालाखे यांनी स्वतःचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यासाठी पक्षांतराचा मार्ग स्वीकारल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश ही रणनीती काँग्रेससाठी मोठा धक्का ठरणार आहे.