
मानोरा बाजार समितीत पावसाने थैमान घालताच शेतकऱ्यांचा मेहनतीचा माल पाण्यात वाहून गेला. या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन येताच दिलासा मिळाला.
पावसाळ्याची चाहूल लागतानाच वाशीम जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची हंबरडा फोडला. कष्टाने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणला असतानाच आभाळ कोसळले आणि बाजार समिती परिसरात शेतमाल अक्षरशः पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बोरव्हा गावातील एक तरुण शेतकरी गौरव पवार यांनी आपल्या भुईमुगाचे पोते वाचवण्यासाठी केलेला आटोकाट प्रयत्न, हा संघर्ष थेट समाजमाध्यमांवरून देशभरातील जनतेपुढे आला. या हृदयद्रावक दृश्याने अनेकांचे मन हेलावले. या घटनेची थेट दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गौरव पवार यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह प्रचंड पावसामुळे मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल विशेषतः भुईमूग, हरभरा, सोयाबीन पावसाच्या पाण्यात भिजून गेला वा वाहून गेला. गौरव पवार यांचा सात ते आठ क्विंटल भुईमूग यामध्ये नष्ट झाला. गौरव पवार यांचे वडील आजारी असून संपूर्ण शेतीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ते म्हणाले, आमच्याकडे पाच एकर शेती आहे. या वर्षी मेहनत करून चांगला भुईमूग घेतला होता. तो बाजारात विकायला आणला अन् काही क्षणांतच सगळं पाण्यात गेलं. डोक्यावर कर्ज आहे. फार मोठं नुकसान झालं.

Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
भावनिक प्रतिसाद
या घटनेचे व्हिडीओ व फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी शेतकऱ्यांच्या दुःखद परिस्थितीबद्दल सहवेदना व्यक्त करत मदतीची मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गौरव पवार यांच्याशी थेट फोनवर संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची व कुटुंबाची विचारपूस करत, संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांनी सांगितले, तुमच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभं आहे. संपूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल. जो माल उरलेला आहे, तो त्या दिवशीच्या बाजारभावाने खरेदी केला जाईल. गौरव पवार यांनी सांगितले, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी स्वत: फोन करून दिलासा दिला. त्यामुळे मला मानसिक आधार मिळाला. ते म्हणाले की, आपण एकटे नाही, सरकार तुमच्या सोबत आहे. हे ऐकून मी भारावून गेलो.”
शेतकऱ्यांवर संकटांचे आभाळ
या घटनेने पुन्हा एकदा विदर्भातील शेतकऱ्यांची अस्थिरता अधोरेखित केली आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांचे श्रम एका क्षणात वाया जातात. अशा परिस्थितीत शासनाची तातडीची मदत आणि दीर्घकालीन संरचना हाच शाश्वत उपाय आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्राकृतिक संकटे थांबवता येणार नाहीत, पण त्या संकटांनंतर शेतकऱ्यांना मदतीचा हात देता येतो. हे उदाहरण म्हणजे गौरव पवार यांची ही हृदयद्रावक घटना. शासन यंत्रणा आणि समाज यांच्यातील समन्वयामुळे अशी संकटे सुसह्य होऊ शकतात. ही घटना म्हणजे केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून संपूर्ण ग्रामीण भागातील असुरक्षित शेतीव्यवस्थेचा आरसा आहे. आता गरज आहे ती, अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस, वेगवान आणि दीर्घकालीन उपाययोजनांची.