
नागपुरात 17 मार्चच्या हिंसेनंतर काँग्रेसने 16 एप्रिल बुधवारी नागपूरमध्ये ‘सद्भावना शांती रॅली’चं आयोजन केलं. उद्देश होता लोकांमध्ये शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणं. पण या शांती रॅलीमध्ये खुद्द नेत्यांचीच परीक्षा झाली, ती म्हणजे उन्हाची परीक्षा.
काँग्रेसच्या सद्भावना शांतता रॅलीची सुरुवात सकाळी 9:30 वाजता नागपुरातील गांधी गेट येथून होणार होती. रूट ठरलेला, गांधीगेट, कोतवाली पोलीस स्टेशन, बडकास चौक, चिटणीस पार्क, देवडिया भवन, भालदारपुरा चौक, गंजपेठ आणि शेवटचा मुक्काम – शुक्रवारी तलावाजवळील राजवाडा पॅलेस. सगळं नीट ठरलेलं होतं. पण, वेळेवर कोण आला नाही? नेते.
सकाळी 9 वाजल्यापासून काँग्रेसचे कार्यकर्ते गर्दी करू लागले होते. पण मोठे नेते वेळेनुसार दोन तास उशिरा पोहोचले. एवढा वेळ जनता उन्हात तळपत थांबली, पण रॅली सुरू झाली ती 11:30 च्या सुमारास. आता एवढ्या वेळात विदर्भाच्या उन्हाने तापमान गाठलं थेट 40 अंश सेल्सियस. आणि मग काय? शांती आणि संयमाचा संदेश देण्यासाठी आलेले नेते स्वतःच संयम गमावू लागले. 5 किलोमीटरची रॅली आधी ठरवली होती. पण फक्त 500 मीटरवरच ‘शांती’ सापडली. गांधीगेटपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत गेले आणि लगेच राजवाडा हॉलच्या दिशेने वळले. या ‘हाफ माइल रॅली’वरून आता चर्चेला उधाण आलंय. विदर्भातले नेते विदर्भाची गरमी सुद्धा सहन करू शकत नाहीत का? असा प्रश्न आता जनता उपस्थित करत आहे.

झलक फक्त काही मिनिटांसाठीच
रॅली संपल्यावर मात्र सभा जोरदार झाली. 500 हून अधिक कार्यकर्ते हजर होते. काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी मंचावरून थेट भाजप आणि संघावर घणाघात केला. त्यांनी आरोप केले की, भाजप आणि संघ देशात द्वेष, हिंसा आणि समाजविघातक प्रवृत्ती पसरवत आहेत. ते इतके तापले की त्यांना रॅलीपेक्षा भाषण सोयीचं वाटलं असावं, अशी प्रक्रिया सर्वत्र उमटत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काही खासदार, आमदार, आणि इतर मोठे चेहरे या कार्यक्रमात हजर होते. पण त्यांची झलक मिळाली ती फक्त काही मिनिटांसाठीच. नंतर बरेच जण थेट ए.सी.मध्ये गायब.
सगळ्यात गमतीशीर बाब म्हणजे, शांतीचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये सर्वात जास्त अस्वस्थता खुद्द नेत्यांमध्ये दिसली. आता नेत्यांच्या ‘सहनशक्तीवर’च प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. अखेर, प्रश्न असा उभा राहतो की, विदर्भातल्या जनता ही ऊन सहन करते, रस्त्यावर राबते. पण त्यांचेच प्रतिनिधी ऊन लागलं की 500 मीटरवरच ‘शांत’ होतात? हा विरोधाभास म्हणजेच विदर्भाच्या विकासासमोरील खरी अडचण आहे का? शांततेचा संदेश द्यायला निघालेल्या रॅलीतली ‘गर्मीची’ ही गोष्ट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.