महाराष्ट्र

BJP : धर्माच्या नावावर नवा साज, समस्यांना मात्र उपवास

Vidarbha : वऱ्हाडच्या समस्यांना सत्ताधाऱ्यांनी वाळीत टाकले

Author

वऱ्हाडच्या मातीत अजूनही विकासाच्या आशा रुजलेल्या आहेत, पण राजकारणाच्या धूळवाटांवर त्या हरवत चालल्या आहेत. समस्यांची सोडवणूक सोडून सत्ताधारी धर्माच्या ध्रुवीकरणाचा खेळ मांडत आहेत, आणि जनता त्याच धगधगत्या अस्मितांच्या आगीत होरपळत आहे.

विदर्भातील वऱ्हाड प्रदेश हा आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच. मागासलेपण, शेतीची अनिश्चितता, औद्योगिक दुर्लक्ष आणि शेतकरी आत्महत्यांची कटू छाया या भागावर कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत याच प्रदेशातील राजकारणाचा पोत बदलला. समस्याकेंद्री राजकारणाच्या जागी आता अस्मिता आणि धर्माधारित राजकीय खेळ सुरू झाले. सत्ताधारी पक्षाने या प्रदेशात धार्मिक ध्रुवीकरणाची नवी चौकट उभी करतानाच पारंपरिक प्रश्नांचे महत्त्व संपुष्टात आणले.

शेती आणि उद्योगाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी राजकीय पुढारी सध्या धार्मिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वऱ्हाडात सातत्याने दौरे करत तथाकथित बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला. प्रशासनावर गंभीर आरोप केले, मात्र कोणतेही ठोस पुरावे न देता जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.

Buldhana : माझ्या लेकरांना सांभाळा, मी हरलो…एका हतबल बापाची अखेरची विनवणी

धार्मिक खेळ

अल्पसंख्यांकांवर संशयाचे ढग निर्माण करून धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविकता पाहता, या भागातील अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेकांना वेळेवर जन्मदाखले मिळाले नाहीत. परिणामी, काहींनी नाईलाजाने खोटी कागदपत्रे जोडून प्रमाणपत्रे मिळवली. मात्र, त्याचा अर्थ त्या सर्वांना परकीय नागरिक ठरवणे हा निव्वळ प्रचाराचा भाग आहे.

उत्पादकांचे कोलमडलेले अर्थकारण

विदर्भातील संत्री उत्पादकांना गेल्या काही वर्षांत मोठा फटका बसला आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेश हा मोठा बाजार होता. विशेष रेल्वेगाड्यांद्वारे संत्री निर्यात केली जात होती. मात्र, बांगलादेशातील सत्तांतरानंतर भारताने संबंध ताणल्याने आयातशुल्क वाढले, परिणामी संत्री उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. हे प्रश्न गंभीर असूनही स्थानिक प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे नेते याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. सोमय्यांचे दौरे नियमित असले तरी त्यांना या प्रश्नांची फिकीर नाही. त्यांना धार्मिक राजकारणात रस आहे, पण शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये नाही.

Parinay Fuke : आरोपांच्या पिचकारीनं नेते अन् खंडणीखोर एजन्ट्सची होळी

सत्ताधाऱ्यांना मोकळे रान

विरोधी पक्षांनीही या परिस्थितीत आपली जबाबदारी झटकली आहे. विदर्भातील पारंपरिक प्रश्नांना बाजूला ठेवत ते केवळ राजकीय सावधगिरी बाळगून आहेत. सोमय्यांच्या आक्रमकतेला विरोध करण्याऐवजी ते शांत राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मुद्दे बनून राहिले आहेत. आज वऱ्हाडातील जनता प्रत्यक्ष समस्यांनी होरपळत असली, तरी राजकारण्यांचे प्राधान्य धार्मिक द्वेष आणि अस्मितावादी प्रचाराला आहे. विदर्भाला पुन्हा समस्याकेंद्री राजकारण मिळेल की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!