
राजकारणाच्या रणधुमाळीत अकोल्यात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कोट्यवधींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होत असून भाजपने विदर्भातील ताकद ठसवून सांगितली आहे.
वर्षानुवर्षे ज्याठिकाणी फक्त आश्वासनांची वावटळ होती. तिथे आता विकासाच्या वाऱ्यांनी उंच भरारी घेतली आहे. विदर्भाच्या हृदयात, अकोल्यात, विकासाच्या नव्या पर्वाचं उद्घोष करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षम नेतृत्वशैली प्रस्थापित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढले असतानाच, फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याने राजकीय रंगमंचावर वेगळाच उजळा पसरवला आहे. 11 जून रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची ठळक गाथा मांडली.
रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं की, देवेंद्र फडणवीस हे केवळ एक मुख्यमंत्री नाहीत, तर विकासाचं महायंत्र आहेत. त्यांनी 2014 पासून विदर्भाच्या अनुशेषाच्या प्रश्नावर केवळ चर्चा केली नाही, तर कृती केली. सिंचन, शेती, वीज, गुंतवणूक, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विदर्भाला वेग दिला. चव्हाण यांनी पुढे सांगितलं की, 2014 ते 2019 वर्षाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या 8 ते 10 तासांच्या भारनियमनाचा (लोडशेडिंग) अंधार दूर झाला. महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त झाला, कारण एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व फडणवीस यांच्या रूपाने लाभलं, असं चव्हाण म्हणाले.

भविष्याला आधार
चव्हाण यांचं भाषण केवळ आकड्यांवर थांबलं नाही, तर त्यात शेतकऱ्यांच्या संघर्षांचाही ठळक उल्लेख होता. “विदर्भातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनांवर जगत होता. पण आता त्याच्या पिकाला हमीभाव मिळतोय, उत्पन्न वाढतंय आणि त्याचा जीवनमान उंचावतंय,” असं सांगत त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचं संयुक्त योगदान अधोरेखित केलं. विदर्भाची ही भूमी म्हणजे उर्जेचा उगम, असं सांगताना चव्हाण यांनी कोळसा, खनिज संपत्ती आणि पावर स्टेशनचं महत्त्व अधोरेखित केलं. ही संपत्ती वापरून फडणवीस सरकारने महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे नेलं, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
Chandrashekhar Bawankule : मायक्रो झोनिंगमुळे मागास वस्त्यांना दिलासा
अखेरच्या टप्प्यात चव्हाण यांनी ठामपणे सांगितलं, हा विकास तात्पुरता नसून दिशा देणारा आहे. तो टिकवून ठेवायचा असेल तर योग्य निर्णय घ्यावा लागेल. ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा केवळ लोकार्पणापुरता मर्यादित नाही, तर तो एक राजकीय संदेश होता की, विदर्भाला उपेक्षेपासून उभारणारा काळ आता संपला आहे. नव्या वाटा, नवी स्वप्नं आणि नव्या संधींसाठी विदर्भ सज्ज आहे आणि या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत ‘देवा भाऊ’, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.