
भाजपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे संविधानावर रोज घाव घालतात, त्यांनाच आज त्याचं रक्षण सुचतंय, हेच मुळात हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला.
देशात आजघडीला संविधानाचा अपमान रोजच होत असताना, ‘संविधान हत्या दिवस’ पाळणाऱ्या भाजपने आरसा पाहावा, असा घणाघाती टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. स्वातंत्र्याच्या वेळी ज्यांची विचारधारा इंग्रजांच्या बाजूने उभी होती. ज्यांनी दीर्घकाळ तिरंग्याला नाकारलं, अशा लोकांनी संविधानाच्या रक्षणाचा मुखवटा घालणं म्हणजे विनोदाचा विषय असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
वडेट्टीवार म्हणाले, ज्यांच्या विचारधारेनं स्वातंत्र्यसंग्रामाला पाठिंबा दिला नव्हता, त्यांनीच आज संविधानाच्या रक्षणाची भाषा करावी, हेच मुळात संविधानाची थट्टा आहे. त्यांनी भाजपवर थेट आरोप करताना म्हटलं की, सध्या देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण आहे. कायद्याला बगल देणं, विरोधकांना टार्गेट करणं, पत्रकारांवर खटले, ही सर्व लक्षणं लोकशाहीच्या गळचट अवस्थेची आहेत. भारतीय जनता पक्ष दररोज संविधान बदलण्याची भाषा करतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तर मनुस्मृती टेबलावर ठेवून बसतात, हेच त्यांचं संविधानाबाबतचं निष्ठावान मत दाखवतं, अशी धारधार टीका त्यांनी केली.

जनतेनंच बहुमत दिलं
वडेट्टीवार यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे आणीबाणीचा इतिहास. ते म्हणाले, भाजप जेव्हा आणीबाणीचा विषय काढतो, तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर निवडणुकीला सामोरं जावं स्वीकारलं. आणि जनतेनं त्यांना भरघोस बहुमत देऊन पुन्हा निवडून दिलं. म्हणजेच आणीबाणी ही त्या काळातली गरज होती हे जनतेनं मान्य केलं होतं.
भाजपच्या ‘संविधान हत्या दिवस’ उपक्रमावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, संविधानाचा अपमान करणाऱ्यांनीच आज संविधान वाचवण्याची भाषा करावी, हे विडंबनात्मक आहे. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या वृत्तीने चालणाऱ्या पक्षाने संविधानाच्या मृत्यूचे शोकगीत गाणं म्हणजे चोराच्या उलट शिरजोरीसारखं आहे. ते पुढे म्हणाले, “देशात आज एकप्रकारची ‘डेली आणीबाणी’ सुरू आहे. पोलिसांचा गैरवापर, संस्थांचं राजकीय शस्त्र म्हणून उपयोग, न्यायसंस्थेवर दबाव, ही सर्व लक्षणं संविधानाच्या मूळ तत्त्वांना अपमानित करणारी आहेत.
Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’
वडेट्टीवार यांचा रोख स्पष्ट होता, संविधानाला खतपाणी घालण्याची नाटकं करणाऱ्यांनी स्वतःच्या घराचं दार पाहावं. त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध काँग्रेस असा वादंग पेटण्याची शक्यता आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर केवळ घोषणा नव्हे तर कृतीही तशी हवी, असा संदेश वडेट्टीवार यांच्या भाषणातून उमटत आहे.