
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या बोगस बियाण्यांच्या कारस्थानाचे धागेदोरे आता थेट मंत्रालयाच्या दारात पोहोचले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारलाच या फसवणुकीच्या रचनेचा भाग ठरवत खळबळजनक आरोप केले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचं योग्य फळ मिळावं. यासाठी वर्षानुवर्षे झगडणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या जगण्याच्या साधनातच फसवणुकीचा डाग लागला आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. शेतकऱ्यांची खुलेआम फसवणूक सुरू आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बोगस बियाण्यांच्या रॅकेटचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. हा प्रकार ‘तुम्ही आम्ही मिळून खाऊ’ अशा भ्रष्ट यंत्रणेचा भाग असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आपण मागील अनेक वर्षांपासून या विषयावर आवाज उठवत आहे. विधानसभेतही या मुद्द्यावर वारंवार चर्चा घडवून आणली. मात्र आजही शेतकऱ्यांना शुद्ध आणि विश्वासार्ह बियाणे मिळत नाही. रब्बी हंगाम असो वा खरीप, प्रत्येक वेळी त्यांचं नुकसानच होतं. हे बियाणेच जर बोगस असतील, तर शेतकरी काय पिकवणार? वडेट्टीवारांनी यावेळी एका मोठ्या षडयंत्राची शक्यता मांडली. बोगस बियाण्यांचा व्यापार हा केवळ काही खाजगी कंपन्यांपुरता मर्यादित नसून, यामागे सत्ताधाऱ्यांचे छुपे समर्थन आहे. मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पोहोचले आहेत. हे केवळ आर्थिक भ्रष्टाचार नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे पातक आहे.

सरकार गप्प बसलंय
वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटले की, शेतकरी आत्महत्या करत आहे, आणि दुसरीकडे त्याच्यावर बोगस बियाण्यांच्या नावाने आणखी अन्याय होतोय. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र पुन्हा आत्महत्या दरात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वडेट्टीवार यांनी सरकारला सूचवले की, बोगस बियाण्यांच्या विक्रीविरोधात कडक कायदा करावा. “किमान 10 वर्षांची शिक्षा आणि बंधनकारक दंडाची तरतूद असावी, जेणेकरून शेतकऱ्यांची अशी फसवणूक पुन्हा होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.
थातुरमातुर चर्चा
कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, रब्बी पिकांची अवस्था या सर्व प्रश्नांवर सरकारकडून केवळ औपचारिक चर्चा होते, पण ठोस निर्णय घेतले जात नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. “सरकार केवळ चर्चेच्या गप्पा करत आहे, प्रत्यक्ष मदत काहीच नाही, असे ते म्हणाले. धुळ्यात विश्रामगृहात सापडलेले रोख पैसे आणि आमदारांना निधी गोळा करून देण्याचे आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडले. ही सगळी साखळी आहे, बोगस बियाण्यांपासून भ्रष्ट निधी पर्यंत. याला छेद देण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घ्यायला हवा. जर आमदारांना पैसे पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून गोळा केले जात असतील, तर ही लोकशाहीची विटंबना आहे.
महाराष्ट्रात बोगस बियाण्यांचं जाळं उलगडल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या खाईत ढकलला जाईल, असा इशारा देत वडेट्टीवारांनी सरकारवर निर्णायक हल्ला चढवला.