महायुतीतील धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर विजय पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात त्यांना आणि त्यांच्या भावाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तरीही त्यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सत्तेची मस्ती
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. महायुती सरकारमधील मंत्र्यांवर वारंवार गंभीर आरोप होत असून काहींना तर कोर्टाने दोषी ठरवले आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लीन चिट देत आहेत. त्यांची पाठराखण करत आहेत. ही सत्तेची मस्ती नाही तर काय? असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत, म्हणून राजीनामा घेतला जाणार नाही, असे अजित पवार सांगत होते. मग आता माणिकराव कोकाटे दोषी ठरले, शिक्षा झाली, तरी अजित पवार त्यांचा राजीनामा का घेत नाहीत? असे वडेट्टीवार म्हणाले.
दिली आठवण
मानहानी प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांची खासदारकी रद्द झाली होती. सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली, अशी आठवण विजय वडेट्टीवार यांनी करून दिली. मग कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत विधानसभा अध्यक्ष कधी निर्णय घेणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महायुती सरकारमधील मंत्र्यांवर आरोप झाले, तरी ते मंत्रिपदावर कायम राहतात. त्यांना सरकारचे संरक्षण मिळते. मात्र, विरोधी पक्षातील कोणी दोषी ठरले, तर 24 तासांत कारवाई केली जाते. ही सत्ता आहे की ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ असा दुटप्पीपणा?” असा तिखट प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्यातील गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी अर्जदाराने स्वतःच्या नावावर कोणतीही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. मात्र, 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. विशेष म्हणजे, या इमारतीतील आणखी दोन सदनिका इतरांनी घेतल्या होत्या, परंतु त्या देखील कोकाटे बंधूंच्या ताब्यात होत्या.
आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लागल्या आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावलेले मंत्री सरकारमध्ये राहणार की त्यांच्यावर तातडीने कारवाई होणार? वडेट्टीवार यांच्या या टिकेनंतर सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
