महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : गाव जळतंय अन् सरकार पळतंय 

Maharashtra Budget Session : वडेट्टीवारांनी मांडले कोळसा माफीयांचे साम्राज्य

Author

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या अनियंत्रित उत्खननामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. कोळसा माफियांचा सत्तेच्या आशीर्वादाने मोठा फैलाव झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. खाजगी कंपन्यांचे मनमानी उत्खनन, वेकोलीच्या अव्यवस्थापनामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. अवैध धंद्यांना मिळालेली मोकळीक ही कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

वेकोली आणि खासगी कोळसा खाणींच्या झपाट्याने विस्तारामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, पर्यावरणीय हानी आणि लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. परंतु, सर्वात मोठी समस्या म्हणजे या खाणींमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अरविंदो, कर्नाटक एम्टा आणि अन्य खाजगी कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. हा कोळसा थेट खुल्या बाजारात विकला जात असल्याचा आरोप आहे.

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी परखड विचारणा

माफियांचा वाढ

विशेष म्हणजे, अरविंदो कंपनीने तीन गावांचे पुनर्वसन न करता कोळसा उत्खनन सुरू केले. यामुळे लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि धूळ प्रदूषण वाढले आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवले जात असल्याने गावकरी झोपू शकत नाहीत. याशिवाय, जिल्हा परिषदेचा सार्वजनिक रस्ता खोदून टाकण्यात आला. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. “ही परिस्थिती गंभीर आहे. गावांचे पुनर्वसन न करता, त्यांना कोणतीही भरपाई न देता हे काम सुरू कसे झाले?” असा ज्वलंत सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

कोळसा खाणींच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे जिल्ह्यात कोळसा माफिया सक्रिय झाले आहेत. त्यांच्या छुप्या कारवायांना सत्तेचा पाठींबा असल्याने, कायद्याचा धाक राहिलेला नाही. या माफियांमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. वेकोली प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या, परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे पांदण रस्ते अडवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना शेती करण्यास अडथळा येत आहे. शासन आणि वेकोलीने एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकारला थेट सवाल

विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांना थेट सवाल केला की, “गावांचे पुनर्वसन न करता, ग्रामस्थांना कोणतीही भरपाई न देता खाणींना परवानगी कशी दिली गेली? सरकार उद्योगपतींच्या दबावाखाली आहे का?” यावर उत्तर देताना खणीकर्म मंत्र्यांनी संबंधित कंपन्यांना पुनर्वसनाच्या अटी पाळण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन दिले.

शासनाने वेळीच योग्य निर्णय घेतला नाही, तर याविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. “ही लूट थांबली नाही, तर मी स्वतः गावकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!